कोल्हापूर - राफेल व्यवहार प्रकरणी शरद पवार यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. राफेल व्यवहार प्रक्रिया मनोहर पर्रिकर यांना मान्य नव्हती म्हणूनच संरक्षणमंत्री पद सोडून ते गोव्यात आले, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी कोल्हापुरात केला. राहुल गांधीनंतर आता प्रथमच शरद पवार मनोहर पर्रीकर यांच्याबाबत बोलले आहेत.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी कोणतीच आश्वासने पाळली नाहीत. लोकांची नाराजी दुसऱ्या मुद्यांवर वळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. देशातील संस्थांवर हल्ला होत आहे. त्याचा राजकीय कामासाठी वापर केला जात आहे. शिवाय सर्वोच्च न्यायाधीश पत्रकार परिषद घेतात ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी म्हटले. सैन्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये. हे सर्वांनी पाळले, परंतु भाजप सरकार त्याला अपवाद आहे. ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी बोलतात. सैन्याचा वापर कोणत्याही पक्षाने राजकीय फायद्यासाठी करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील होत असलेल्या सभांचे शरद पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. मोदी-शाह घातक आहेत, हे ते सर्वांना सांगत आहे. जे चुकीचे चालले आहे ते राज ठाकरे प्रभावीपणे मांडत आहेत. आपल्या भाषणात ते हे उदाहरणांसह दाखवत आहेत आणि ते अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यांच्या सभांचा फायदा होईल, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे आणि आम्ही निवडणुकीत एकत्र नाही, पण राज्य चुकीच्या लोकांच्या हातातून काढून घेण्यासाठी सर्वांची मदत घेणार असल्याचेही ते म्हणाले.
मोदींनी निश्चित काय केले हे त्यांना माहिती नाही. मोदींना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, त्यामुळे लोक बदल करण्याचा मनस्थितीत आहेत. भाजप आणि सेनेच सरकार नको, अशी लोकांची मनस्थिती. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत सातत्य होत ते आज राहीले नसल्याचेही यावेळी शरद पवार म्हणाले. शिवाय पहिल्या टप्प्यातील मतदानात काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.