कोल्हापूर - जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातील प्राथमिक शाळेचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. छत कोसळलेल्या खोलीमध्ये पहिलीच्या वर्गातील मुले बसत होती. मात्र, शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटना घडल्यानंतर संतप्त पालकांनी मुले शाळेत पाठवणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
१९५२ साली बांधलेल्या या शाळेच्या इमारतीकडे गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पालकांनी या खोलीच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला निवेदनही दिले होते. मात्र, झोपलेल्या प्रशासनाला जाग आलेली नाही. सकाळची शाळा असल्याने मुले आज लवकर घरी गेली होती. अन्यथा आज याठिकाणी मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते.
एकीकडे मुंबईसारख्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तत्काळ संबंधितांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले. मग आता वाघवे सारख्या लहान गावांमध्ये सुद्धा जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.