कोल्हापूर Eco Friendly Calendar : पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या द काॅन्झर्व्हेशन फाऊंडेशन ऑफ इंडियानं पुनर्वापर केलेल्या बियाण्यांपासून पर्यावरणपूरक कागदी दिनदर्शिका बनवलीय. तसंच दिनदर्शिकेतून निघाणाऱ्या बियाणापासून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबेल, असं द काॅन्झर्व्हेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. आशिष घेवडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.
दिनदर्शिकेतून उगवणार रोपे : या पर्यावरणपूरक दिनदर्शिकेचं नुकतंच कोल्हापुरात प्रकाशन झालं. कागदी उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यामुळं जागतिक समस्या लक्षात घेऊन कोल्हापुरातील संवर्धन प्रतिष्ठान विविध वनस्पतींच्या बियांपासून कागद बनवत आहे. सर्वसाधारणपणे, कॅलेंडरसाठी लागणारा कागद वर्ष संपल्यानंतर फेकून दिला जातो. मात्र, ही दिनदर्शिका फेकल्यानंतर त्यातून विविध रोपं उगवणार असल्याचं घेवडे यांनी म्हटंलय.
दिनदर्शिकेत 'या' वनस्पतीच्या बियांचा समावेश : या दिनदर्शिकेत झेंडू, तुळस, कुरडू, पालक, मिरची, टोमॅटोच्या बियांचा समावेश करण्यात आला आहे. दिनदर्शिकेत पालेभाज्यांच्या बिया प्रक्रिया करताना कागद्याच्या लगद्यात घातल्या जातात. महिना संपल्यानंतर हा कागद एक रात्र पाण्यामध्ये भिजवला जातो. यातून मिळणाऱ्या बियांचा पुनर्वापर करून वनस्पतींची पुन्हा उगवण केली जाते.
दुर्गम भागात प्रबोधन : कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागात असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचं प्रबोधन व्हावं, यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सीड पेपरचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, पन्हाळा गगनबावडा, शाहुवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पर्यावरण पूरक दिनदर्शिका, कशी बनवतात याचे धडेही विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. या उपक्रमासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे, आदिश अमरदिप अॅडफाईनचे अमरदिप पाटिल, आमिर शेख, चैतन्य पोतदार, सौरभ दबडे, मितेष घेवडे डॉ. अंजली यांच्यासह पदाधिकारी या उपक्रमात सहभाग नोंदवतात.
हेही वाचा -