कोल्हापूर - आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर तरुण मतदारांसह अनेकांच्या मनात घर केलेले नूतन खासदार धैर्यशील माने यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा तब्बल एक लाख मतांनी पराभव करत संपूर्ण राज्यासह देशात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विजयानंतर धैर्यशील मानेंचे मोतोश्रीवरून कौतुक झालेच पण त्यांची दखल थेट अमित शाह यांनी सुद्धा घेतली असल्याचे समजते आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर लाखोंच्या संख्येने काढलेल्या किसान मोर्चाने मोदी सरकारला सुद्धा घाम फोडणाऱ्या राजू शेट्टींच्या पराभवाची बातमी समजताच मानेंवर महाराष्ट्रातील नेतेमंडळींकडून कौतुकांचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यामुळेच आता या युवा नेतृत्वाला थेट मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नूतन खासदार धैर्यशील मानेंचा राजकीय प्रवास सुद्धा अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरू झाला. 2002 मध्ये त्यांनी रुकडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जिल्हापरिषदेची निवडणूक सुद्धा लढवली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अडीच वर्षे उपाध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवले. या सर्वांच्या माध्यमातून त्यांना जवळपास 15 वर्षांचा राजकीय अनुभव आणि राजकीय वारसा असल्याने गेल्या वर्षभरापूर्वीच त्यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असून कसल्याही परिस्थिती ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्याने धैर्यशील मानेंनी आई माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह सेनेमध्ये प्रवेश करत हातकणंगलेमधून तिकीटही मिळवले.
ज्यांनी राज्याच्या महासूलमंत्र्यांसह देशाच्या पंतप्रधानांना आपल्या विरोधात उभे राहण्याचे आव्हान दिले होते, त्या राजू शेट्टींशी मानेंचा सामना होणार होता. सुरुवातीच्या काळात माने शेट्टींविरोधात निवडून येण्याचे लांबच त्यांना टक्कर सुद्धा देऊ शकणार नाहीत, असे सर्वांना वाटत होते. पण आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर शेट्टींनी मतदारसंघात काय केले, काय केले नाही, हे न सांगता मला या मतदारसंघात कोणती विकासात्मक धोरणे घेऊन कामे करायची आहेत, हे पटवून देण्यात ते यशस्वी झाले आणि राजू शेट्टींचा त्यांनी जवळपास 1 लाख मतांनी पराभव केला.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील युवा मतदारांच्या मिळालेल्या पाठिंब्यावर माने आता थेट लोकसभेत पोहोचले असले तरी त्यांच्याकडे मात्र आता मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरुण तडफदार नेतृत्व याच्या जोरावर यापुढेही हा मतदारसंघ आपल्याकडेच शाबूत ठेवण्यासाठी त्यांना थेट मंत्रिमंडळात संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. विशेष म्हणजे यावेळच्या मंत्रिमंडळात ५० टक्के नवीन चेहरे असणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्री पदांमध्ये मानेंना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.