कोल्हापूर - गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापुरातील कुंभार समाज आर्थिक नुकसान सहन करत आहे. यंदाही कोरोनामुळे राज्य सरकारने यंदाच्या गणेशोत्सवात मूर्तीवर निर्बंध लागू करण्यात केले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या मोठ्या गणेशमूर्तींचे काय करायचं? असा सवाल कुंभार समाजाने केला आहे. राज्य सरकारने सहा फुटापर्यंत गणेशमूर्ती बसविण्यास परवानगी द्यावी, अन्यथा काय करायचे ते करा आम्ही तयार आहोत, असा सज्जड इशारा कुंभार समाजातील बांधवांनी दिला आहे.
ऐनवेळी निर्णय झाल्याने पुन्हा एकदा कोट्यवधींचा फटका -
मागील वर्षीपेक्षा यंदा कोरोनाचा कहर काही प्रमाणात कमी झाला आहे, असा विचार करून कुंभार समाजातील या मूर्ती व्यावसायिकांनी पुन्हा मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. लाखो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी तीन फुटापासून ते अठरा फुटापर्यंत मूर्ती बनवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राज्य सरकारने वेळोवेळी पुन्हा तोच निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा या व्यावसायिकांना कोट्यावधींचा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नियमावलीत बदल करावा. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात कुंभार समाजावर कोणतेच निर्बंध घालू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - #Ganeshotsav2021 : राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर; वाचा, नियमावली...
राज्य सरकारने गुन्हे नोंद केले तरी चालेल -
कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कुंभार समाजातील या व्यावसायिकांचेही अतोनात हाल झाले आहे. त्यामुळे यंदा राज्य सरकारने कुंभार समाजाचा विचार करावा. गणेशोत्सवात कोणतेही निर्बंध लावू नये. पोट भरण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी, अन्यथा राज्य सरकारच्या उलट भूमिका घेऊन मूर्ती सहा फुटांच्या करण्यास सुरुवात करू, त्यावर राज्य सरकारने गुन्हे नोंद केले तरी चालतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कुंभार समाजाशी चर्चा न करता निर्णय -
राज्य सरकारने गेल्या वर्षी निर्बंध घातले होते. त्यावेळी अनेक मोठ्या मूर्ती पडून आहेत. कोट्यवधींची नुकसान झाले आहे. यावेळी कुंभार समाजाशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, विश्वासात न घेता राज्य सरकारने निर्बंध लागू केले.
हेही वाचा - राजकीय कार्यक्रमांना परवानगी, मग गणेशोत्सवाच्या नियमावलीत कठोरता का? - गणेशोत्सव मंडळ