जालना- मुंबई येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या 42 कामगारांना सोमवारी सायंकाळी पोलिसांनी नाव्हा रोडवर पकडले आहे. त्यांना शहरातील भर वस्तीत असलेल्या नूतन वसाहत परिसरातील नगरपालिकेच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक (विसावा) शाळेत ठेवले आहे. त्यामुळे परिसरात चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात दाट वस्ती आहे. त्यामुळे आणखीनच लोक घाबरुन गेले आहेत.
हेही वाचा- लॉकडाऊन : जीवनावश्यक वस्तुंसाठी ६०.९ टक्के भारतीयांना मोजावे लागताहेत जादा पैसे
या कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक आले होते. मात्र, या शाळेत विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे हे पथकही परत गेले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ सुरू झाला. पोलिसांना देखील काय करावे हे सुचत नव्हते. प्रशासनाने नियोजन तर केले मात्र चुकीचे केले. त्यामुळे हा सर्व गोंधळ उडाला आहे. बाहेरगावाहून आणि होम क्वारंटाईनचे शिक्के असलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या मस्तगड, डबलजीन, नूतन वसाहत, चंदनजिरा, नागेवाडी, आणि रामनगर या शाळा निवडल्या आहेत. या सर्व शाळा भर वस्तीमध्ये आहेत. त्यामुळे या शाळा निवडून प्रशासनाला जनतेमध्ये भीती निर्माण करायची आहे का? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, (एमएच 04 जेयु 4591) या ट्रक मधून आलेले 42 कामगार शाळेत ठेवल्यानंतर बराच वेळाने याबाबत निर्णय घेण्यात आला. सर्वांना शासकीय रुग्णालयात तपासण्यासाठी पाठविण्यात आले. दरम्यानच्या काळात प्रशासनाने त्यांना जेवणाचे पाकीट दिले. परिस्थिती हाताबाहेर जात आहे. हे पाहून विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती बनसोड, नगर सेवक अरुण मगरे, पिंटू रत्नपारखे, आदींनी हे प्रकरण हाताळले.