जालना - वखार महामंडळाच्या गोदामात साठवलेल्या कापसाच्या गाठीला आग लागल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दुपारी उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.
दहा नंबरचे गोडाऊन -
जालना-भोकरदन रस्त्यावर राजुर चौफुली जवळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम आहे. या गोदामामध्ये सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाच्या गाठी साठवून ठेवल्या जातात. या गोदामामधून गाठींचे वितरण सुरू असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती खाते अधीक्षक प्रमोद देशपांडे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले आणि आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू झाले. 10 नंबरचा गोदामांमध्ये 4200 गाठी साठवून ठेवलेल्या आहेत.
हेही वाचा - गोपीचंद पडळकरांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौफेर टिका
अधिकारी लोकप्रतिनिधींची भेट -
गोदामाला लागलेल्या भीषण आगीची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी, लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली. यामध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, नायब तहसीलदार शीतल बंडगर, आदींनी पाहणी केली. अग्निशमन दलाचे 5 अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, खासगी टँकर, यांची मदत घेऊन आटोक्यात आणण्याचे प्रयत्न दुपारी उशिरापर्यंत सुरू होते. आग कशाने लागली आणि किती नुकसान झाले. हे मात्र अद्यापपर्यंत निश्चित झाले नाही.