बदनापूर (जालना) - कोरोना रोगाची लागण वाढू नये, म्हणून सध्या देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा मोठ्या महानगरात काम करणारे मजूर सध्या पायी आपल्या गावी जात आहेत. तालुका विधी सेवा समिती बदनापूरतर्फे न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते या पायी जाणाऱ्यांना चहा – बिस्कीट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
![vidhi seva samiti helped migrant labours in badnapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7108709_994_7108709_1588913163972.png)
मोठ्या महानगरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनदेखील वाढवण्यात येत आहे. त्यामुळे मजुरी काम करणारे परजिल्हा, परराज्यातील मजुर औरंगाबाद – जालना महामार्गाने पायी जाताना दिसून येत आहेत. लहान मोठी बालके, वृध्द डोक्यावर मोठमोठे गाठोडे बांधून पायी आपले घर जवळ करत आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात दुकाने, हॉटेल उघडी नसल्यामुळे खाण्या- पिण्याचेही त्यांचे हालच होत आहेत. या परिस्थितीत तरीही हे मजुर पायी मार्गक्रमण करताना दिसून येतात.
![vidhi seva samiti helped migrant labours in badnapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7108709_422_7108709_1588913092923.png)
काही गावात स्वयंसेवी संस्था त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करतात. बदनापूर येथूनही मोठ्या संख्येने हे मजूर जात असल्यामुळे तालुका विधी सेवा समितीतर्फे सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती भाग्यश्री पाटील, तालुका विधी सेवा समितीचे गायकवाड, ताडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम, काळे, गायकवाड यांनी थेट रस्त्यावर वाहनातून येऊन या पायी जाणाऱ्या मजुरांना बिस्किटे व चहा पाणी दिले.