बदनापूर (जालना) - औरंगाबाद ते जालना या मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी टोलनाके असून या रस्त्याची निर्मिती व देखभाल करण्याचे काम या कंपनीकडे असताना मागील दोन ते तीन महिन्यांपासून या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. या खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याने याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. टोल वेज कंपनी मात्र सदरील रस्त्याची दुरुस्ती करत नसल्यामुळे प्रशासन काय करत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. आता या झोलबाज टोलवेज कंपनीकडे दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच कारवाईचा बडगा उघडून हा रस्ता दुरुस्त करवून घेण्याची मागणी सामान्य वाहनधारक करत आहेत.
या वर्षी पावसाचा जोर चांगला असल्यामुळे ही कंपनी पावसावर आपला दोष ढकलत असल्याचे चित्र आहे. मात्र मान्सूनपूर्व मार्च ते जून दरम्यान या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची आवश्यकता असताना कोरोना रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्या दरम्यान महामार्गावर अतिशय कमी वाहतूक होत होती. त्याचवेळी जर मजबुतीकरण झाले असते, तर या रस्त्याची इतकी खराब अवस्था झाली नसती. दरवर्षी जानेवारीनंतर या रस्त्याचे मान्सूनपूर्व कामे करून मजबुतीकरण आणि अस्तरीकरण करण्यात येते. औरंगाबाद–जालना या महामार्गाचा देखभाल व दुरुस्ती टोलवेज कंपनीकडे असून त्या कंपनीने उन्हाळयात करण्यात येणारे मान्सूनपूर्व कामे न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाच्या दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष केले.
या दुर्लक्षामुळे या पहिल्याच पावसात या रस्त्याची दूरवस्था झालेली असून ठिकठिकाणी खड्डे पडून पाणी साचले आहे. या खड्डयांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत तर अनेक चारचाकी गाड्यांचे चेंबर फुटून नुकसान होत आहे. मागच्या वर्षीही परतीच्या पावसानंतर या महामार्गावर प्रचंड खड्डे पडून दूरवस्था झालेली होती; परंतु तेव्हाही टोलवेज कंपनीने थातूर मातूर काम केल्यामुळे या वर्षी पहिल्याच पावसाने या रस्त्यावर खडयाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.पावसामुळे पडलेल्या या खडडयात सदरील कंपनीचे कर्मचाऱ्यांनी दोन ते तीन वेळेस डांबर व मुरुम-खडी आणून टाकली, पण आता पडणाऱ्या पावसाने सदरील कच्चा मुरुम टिकत नसल्याचे चित्र असून खड्डे आणखी मोठमोठे होत आहेत. दुर्लक्ष करून वाहनधारकांना कसरत करणाऱ्या लावणाऱ्या या निरंकुश टोलवेज कंपनीवर आता जिल्ह्याधिकाऱ्यांनीच कारवाईचा बडगा उघडावा अशी मागणी वाहनधारक करत आहेत.
भाजयुमोने साजरा केला खड्डयांचा वाढदिवस
दरम्यान आज या रस्त्यावर खड्डे पडल्याच्या निषेधार्थ भाजयुमोने या खड्डयांचा वाढदिवस साजरा करून या मुख्य रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. या वेळी चक्क केक कापून करून उपरोधिक घोषणा देण्यात आल्या. या वेळी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष गणेश कोल्हे, नंदकिशोर शेळके, महेश लढढा, भास्कर घनगाव, कल्याण काळे, अमोल चव्हाण, आसाराम गरड, योगेश कान्हेरे, अरूण पठाडे, विनोद मगरे आदींसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.