बदनापूर (जालना) - बदनापूर पोलीस आणि नगर पंचायतच्या संयुक्त पथकाने आज सकाळी ९ वाजेपासून जालना-औरंगाबाद महामार्गावर धडक मोहीम राबवून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. ही कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व त्यांचे सहकारी सकाळपासून महामार्गावर तळ ठोकून होते. यावेळी नगर पंचायतच्या मार्फत विना मास्क फिरणाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला.
जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत चालला असून, सुरुवातीपासून बदनापूर पोलीस आणि नगर पंचायत प्रशासनाने केलेल्या कामामुळे बदनापुरात कोरोनाला पाय रोवता आला नव्हता. मध्यंतरी दोन व्यापारी व त्यांच्या दोन कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली होती. तेही बरे होऊन घरी आलेले आहे. त्यानंतर शहरात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन मोठया प्रमाणात प्रयत्न करत आहेत. सरकारच्या नियमानुसार चेहऱ्यावर मास्क घातल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी न येण्याचे निर्देश आहेत. मात्र, बदनापूर शहरात काही ठिकाणी मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी येत असल्याचे निदर्शनास आले.
बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून थेट जालना-औरंगाबाद महामार्गावर तळ ठोकून चेहऱ्यावर मास्क नसणाऱ्यांवर थेट कारवाई केली. तसेच नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांनी यावेळ दंड वसूल केला. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम, चरणसिंग बमनावत, जॉन कसबे यांच्यासह नगर पंचायतचे ज्ञानेश्वर रेगुडे, रशिद पठाण, सय्यद दस्तगिर, तेजराव दाभाडे, हिंमत कांबळे, अशोक बोकन यांनी नगर पंचायतच्या माध्यमातून दंड वसूल केला.
जवळपास ५० ते ६० विना मास्कवाल्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला. पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी यावेळी नागरिकांना आवाहन करून सोशल डिस्टन्सिंग पाळावे, विना मास्क फिरू नये आणि भाजी व फळविक्रेत्यांनी ठरवून दिलेल्या जागेतच व्यवसाय करण्यासंबंधी आवाहन केले. तसेच नियमभंग करेल त्यांच्यावर आता ठोस कारवाई करण्याचा इशारा दिला.