जालना - जिल्हा परिषदेच्या 235 माध्यमिक शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार थकले आहेत. दसरा, दिवाळी सण तोंडावर आहे. त्यामुळे नवीन खरेदी तर सोडाच मात्र यापूर्वी केलेल्या खरेदीचे हप्ते देखील भरणे मुश्कील झाले आहे. पहिले हप्ते फेडण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे शिक्षक जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवत आहेत .मात्र, पगार हाती येण्यासाठी अजून तिसरा महिना ही संपण्याची चिन्हे दिसत आहेत.
जालना जिल्हा परिषदेमध्ये 215 माध्यमिक शिक्षक आणि 20 विशेष शिक्षक, असे एकूण 235 शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शिक्षकांचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा पगार अजून झालेला नाही. ऑक्टोबर देखील आता संपत आला आहे. दसरा, दिवाळी हे सण तोंडावर आहेत. या सणाच्या निमित्ताने प्रत्येक जण काही ना काही तरी खरेदी करत असतो. मात्र, शिक्षकांचा पगार झाला नसल्याने पूर्वी घेतलेल्या वस्तूंचे हफ्ते फेडण्यासाठी या शिक्षकांवर दुसरे कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
ईटीव्हीच्या प्रतिनिधींनी थकलेल्या पगाराविषयी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना विचारले असता पगार थकला नसल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात पगार थकले असल्याची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आणि याची शहानिशा केल्यानंतर शिक्षण विभागाने त्यांच्यापासून ही बाब दडवून ठेवल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, या प्रकरणी आठ दिवसात आपण लक्ष घालून तीन महिन्यांचा पगार एकदमच देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली. तसेच शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनीही आतापर्यंत आपण पुणे कार्यालयाशी वारंवार संपर्क केला. मात्र निधी उपलब्ध झाले नाही. त्या संदर्भातील काही त्रुटी दूर करण्यासाठी विशेष कर्मचाऱ्याला पाठवून हे पगार आपण लवकरात लवकर करणार असल्याचेही सांगितले.
हेही वाचा - कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - महसूल राज्यमंत्री सत्तार