जालना - हिंदू संस्कृतीनुसार होळी हा सरत्या वर्षातील शेवटचा सण. रंगांची उधळण करून हा सण साजरा केला जातो. परंतु हे दुसरं वर्ष आहे की ज्यावेळी रंगांची उधळण होणार नाही ,कोरोनाचा कहर वाढत आहे आणि त्याचा हा परिणाम आहे .असे असले तरीही निसर्गाने पळसाच्या माध्यमातून रंगांची केलेली उधळण ही वाटसरूंना आकर्षित करून घेते. निसर्गाच्या या रंग उधळण्यावर कोरोनाचा मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.
हेही वाचा - मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण, सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
पळसाच्या फुलांचा रंग
उजाड माळरानावर मुरमाड जमिनीत येणारे हे पळसाचे झाड .या झाडाचा स्वभाव देखील विचित्र आहे . जेवढ ऊन कडक तेवढं हे झाड आकर्षक दिसतं. लहान रोपट्यापासून उंच आणि अनेक वर्षे टिकणारे हे झालं आहे. उन्हाळ्यामध्ये या झाडाला एकही पान राहत नाही, परंतु केशरी रंगाच्या आकर्षक फुलांनी वाटसरूंना मोहून टाकणार हे झाड आहे. आयुर्वेदामध्ये या झाडाला खूप महत्त्व आहे. सामान्य माणसाला या झाडाचे दोनच उपयोग माहीत आहेत.एक म्हणजे जेवणासाठी पत्रावळी आणि दुसरा म्हणजे होळी साठी रंग.सध्याच्या काळात या झाडाची पाने तोडून त्याच्या पत्रावळी होतील असे दिवस राहिलेले नाही.परंतु फुलांच्या रंगाचा उपयोग होळीसाठी केला जाऊ शकतो.मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने हा आनंदही हिरावून घेतला आहे.आकर्षक रंगांच्या या फुलांना खलबत्त्यामध्ये कुटल्यानंतर ते उकळून घेतले तर नैसर्गिक आणि सुगंधित असा सुंदर केशरी रंग तयार होतो.परंतु रासायनिक आणि केमिकल च्या जमान्यात हा रंग तयार करण्याचा कुटाना करायला कोणाला वेळच नाही. कोणी याचा उपयोग करो अथवा न करो निसर्गाने मात्र मुक्तहस्ते आजही या रंगांची उधळण सुरू ठेवलेली आहे. रखरखत्या उन्हामध्ये पळसाच्या फांद्यांवर वार्याच्या झुळकेने डोलणारी हि केशरी रंगांची फुले आजही मन मोहून टाकतात.
हेही वाचा - 'एटीएस'च्या तपासात राज्य सरकारमधील मंत्री हस्तक्षेप करतायेत - आशिष शेलार
वैद्यकशास्त्रात देखील महत्त्व
या पळसाला वैदिक शास्त्रात देखील महत्त्व आहे. कोणी पळस,पलाश ,ब्रम्हवृक्ष, अशा वेगवेगळ्या नावांनी या झाडाला ओळखतात. मौंजीबंधन ( उपनयन संस्कार) च्या वेळी या पावसाच्या फांद्यांचे किंवा काठीचा ब्रह्माचा दंड म्हणून उपयोग केला जातो. या पानांच्या देठाचा मधुमेहासाठी उपयोग केला जातो. झाडाची हिरवी पाने तोडून ती जपून ठेवल्यास, त्याचा वापर करता येऊ शकतो. कारण ज्यावेळी पानांवर पाणी शिंपडले जाते. किंवा पाण्यात पाने भिजवले जातात. त्यावेळी ही पाने पुन्हा नरम होतात. त्यांतील लवचिकता ही हिरव्या पानांएवढीच मिळते .त्यामुळे वाळलेल्या पानांपासून देखील पुन्हा पत्रावळी लावता येतात. अशा या पळसाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग आयुर्वेदात केला जात आहे. अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त असलेल्या या झाडाला पानाफुलांनी महत्त्व आहे .परंतु, कोरोनाच्या महामरीमुळे वैद्य आणि गरजूं लोकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.