जालना - लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्गही वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी आता महानगरपालिका सरसावली आहे. आठ दिवसांपूर्वी जालना शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फुले मार्केटमधील अतिक्रमणे हटवल्यानंतर आता पालिकेने आपला मोर्चा दाना बाजाराकडे वळवला आहे. आज या ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली.
नवीन जालन्यातील दाना बाजार, खवा मार्केट, महात्मा फुले मार्केट, सिंधी बाजार, फुलबाजार ही अत्यंत गर्दीची ठिकाणे आहेत. त्यामुळे येथे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. मात्र, त्यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे ती हटवायची कोणी? असा प्रश्न आत्तापर्यंत होता. त्यामुळे वर्षानुवर्ष ही अतिक्रमणे तशीच होती. मात्र, आता कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता नगरपालिकेला अतिक्रमणे हटवण्याची संधी चालून आली.
दाना बाजारात दुकानांसमोरील ओटे, दुकानावर लावलेली पत्रे, लाकडाचे टेबल हे नगरपालिकेच्या पथकाने काढून टाकले. याकामात नगरपालिका प्रशासनाला पोलीस प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणात मदत केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हे स्वतः याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासोबत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भूज काकडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले यांच्यासह नगरपालिका कर्मचाऱयांचा मोठा ताफा कार्यरत होता.