जळगाव - आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता केवळ चर्चा करणारा देश राहिलेला नाही. तर अमेरिका आणि इस्त्राईल या देशांच्या पाठोपाठ शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणारा बलवान देश झाला आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव येथील जाहीर प्रचार सभेत केले.
काँग्रेसचा ‘गरिबी हटाव’चा नारा म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असल्याची घणाघाती टीकादेखील त्यांनी यावेळी केली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ जळगावात आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, उमेदवार उन्मेश पाटील, माजीमंत्री सुरेश जैन, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, चंदुलाल पटेल, स्मिता वाघ, उपमहापौर अश्विन सोनवणे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ उपस्थित होते.
आमचे तर लव्ह मॅरेज, तुमचे काय
आपल्या शैलीदार भाषणाने ओळखले जाणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, शिवसेना-भाजपसोबत फरफटत गेल्याची टीका आमच्यावर आघाडीकडून केली जाते. भाजप-सेना म्हणजे आमचे तर लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे आमच्यात सतत वाद होतात. पण आम्ही एकत्र येतोच. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचे तर साधे लफडेही नाही. मग तुम्ही कशाला एकमेकांचे मुके घेता? अशा शब्दात पाटील यांनी आघाडीची टर उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस ही फुटलेल्या गुंडाची टोळी असल्याची सणसणीत टीकाही त्यांनी यावेळी केली.