जळगाव- विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेला शह देण्यासाठी आम्ही राज्यातील काही मतदारसंघांमध्ये जाणीवपूर्वक तडजोडी केल्या आहेत. त्यात दोन ते तीन मतदारसंघात मनसेसोबत तडजोड केल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी मंगळवारी सकाळी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शरद पवार पुढे म्हणाले, काही मतदारसंघांमध्ये आम्हाला असे वाटले की, जर आम्ही त्याठिकाणी निवडणूक लढवली तर भाजप आणि सेनेला अप्रत्यक्षपणे मदत होण्याची शक्यता आहे. अशा मतदारसंघातून जर आम्ही बाजूला झालो तर भाजप-सेनेच्या विरोधी उमेदवाराला ताकद मिळू शकते, असे आमच्या निदर्शनास आले. त्यामुळे भाजप आणि सेनेला शह देण्यासाठी आम्ही राज्यातील काही मतदारसंघांमध्ये जाणीवपूर्वक तडजोडी केल्या आहेत. त्यात दोन ते तीन ठिकाणी मनसेचे उमेदवार आहेत, असे पवारांनी सांगितले.
पूर्वीच्या काळी विचारांना किंमत होती
पूर्वीच्या काळी विचारांना किंमत होती. कार्यकर्ते देखील नेत्यांकडून काही अपेक्षा करत नव्हते. पैसे देऊन किंवा घेऊन काम करायचे, असे तर यत्किंचितही नव्हते. आज काही जिल्ह्याचे नेते त्यांच्या जिल्ह्याचे तर सोडाच संपूर्ण महाराष्ट्रात पैशांचे राजकारण करायला यशस्वी झाले आहेत. हे कधी आम्ही पाहिले नव्हते. हा मोठा बदल पूर्वीच्या तुलनेत आता झाला आहे.
हेही वाचा- भुसावळ हत्याकांडाची सीआयडी चौकशी व्हावी - रामदास आठवले
सत्तेच्या आणि पैशांचा प्रचंड मारा करणे, माणसे फोडणे, विकत घेणे असे प्रकार सुरू आहेत. वेगवेगळ्या समाजाला, त्यांच्या प्रमुखाला हाताशी धरून त्या समाजाचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्याच्या नेतृत्त्वाचा प्रश्न सोडविण्याची खबरदारी आज घेतली जात आहे. हा घडलेला मोठा बदल चिंताजनक आहे, असेही पवारांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
हेही वाचा- ३७० कलमाच्या माध्यमातून लोकांच्या भावनेला हात घालण्याचे काम; शरद पवारांची भाजपवर टीका