जळगाव - पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. भारतीय लष्कराने या हल्ल्याला प्रत्त्युत्तर द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरूवारी पाकिस्तान येथील जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या अजहर मेहमूदच्या इशाऱ्याने सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी आत्मघाती हल्ला करण्यात आला. यात सीआरपीएफचे सुमारे ४४ निष्पाप जवान वीरमरण पावले. ही घटना देशवासियांसाठी मन हेलावून टाकणारी आहे. या भ्याड हल्ल्याचा अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी छोट्या जवानांनी मानवी साखळीने 'HATE' हा शब्द तयार करून तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर वीरमरण आलेल्या जवानांना प्राचार्य पी. एम. कोळी व सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली दिली. यावेळी हवालदार डी. पी. बोरसे, नायब सुभेदार भटू पाटील आदींसह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.