जळगाव - शहरातील सर्वच रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, हेच कळायला मार्ग नाही. रस्त्यांच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाच्या वतीने केक कापून रस्त्यावरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले हे आंदोलन लक्षवेधी ठरले.
जळगाव शहरातील विविध कॉलन्या, उपनगरांसह सर्वच प्रमुख रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. खराब रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अनेक रस्त्यांची इतकी बिकट अवस्था आहे की, त्यावरून वाहने तर सोडा पण पायी चालणेही मुश्किल आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यावरून वाहन गेल्यानंतर धुळीचे लोळ उडतात. यामुळे रस्त्याशेजारी राहणारे नागरिक तसेच व्यावसायिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. ओबडधोबड असलेल्या रस्त्यांवरून वाहने घसरत असल्याने अपघातदेखील वाढले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे, विकासकामेही संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपचा निषेध नोंदवण्यात आला.
सत्ताधाऱ्यांना पडला आश्वासनांचा विसर
यावेळी माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी म्हणाले की, भाजपची महापालिकेत सत्ता येऊन दोन वर्षे झाली. पण अजून शहरात रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. आमदार सुरेश भोळे 'चीड येते खड्ड्यांची' असे म्हणत निवडून आले. त्यांना आता खड्डे दिसत नाहीत का? असा सवाल लाडवंजारी यांनी उपस्थित केला. शहरात विकासकामेही संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वेळोवेळी आंदोलने होत आहेत. परंतु, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष साहिल पटेल, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, कैसर काकर, ममता तडवी, पंकज नाले, विशाल देशमुख, जयेश पाटील यांची उपस्थिती होती.