जळगाव - जिल्ह्यात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. घराबाहेर पडणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. असे असताना जळगावकरांना मात्र आपल्या जिवाची पर्वा नसल्याचे चित्र आहे. अक्षय्य तृतीयेचा सण उद्यावर आला आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी जळगावातील फळ मार्केटमध्ये आंबे खरेदीसाठी तोबा गर्दी उसळली होती. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असताना प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळाले.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीयेचा सण रविवारी आहे. यावर्षी अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट आहे. मात्र, जळगावातील नागरिकांना त्याचे कोणतेही सोयरसूतक नसल्याची स्थिती आहे. शनिवारी सकाळी जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातील फळ बाजारात आंबे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आंब्याच्या लिलावासाठी अनेक छोटे-मोठे व्यापारी तसेच खरेदीदार ग्राहक एकाच वेळी एकत्र आल्याने झुंबड उडाली होती. सोशल डिस्टन्सिंगचा यावेळी अक्षरशः फज्जा उडाला. अनेकांनी तोंडाला मास्क देखील लावलेले नव्हते. कोरोना विषयी नागरिकांना अजूनही गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

कोरोनामुळे फळ बाजारावर मंदीचे सावट - कोरोनाचा फटका जळगावातील फळ बाजाराला देखील बसला आहे. फळ बाजारावर मंदीचे सावट आहे. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात परराज्यातून शेकडो टन आंब्यांची आवक होते. मात्र, यावर्षी अवघ्या 10 ते 15 ट्रक आंब्यांची आवक झाली आहे. कर्नाटकातील बंगळुरू, आंधप्रदेशातील विजयवाडा येथून गुलाबखस, बदाम, केसर जातीच्या आंब्यांची आवक झाली आहे. कोकणातील हापूस आंब्यांची देखील तुरळक आवक आहे. दुसरीकडे, आंब्यांना हवी तशी मागणी नसल्याने भावही पडले आहेत. जळगावात आंब्यांना 80 रुपयांपासून दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो असा दर आहे. इतर फळांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. परराज्यांसह इतर जिल्ह्यातून फळांची आवक मंदावली आहे. फळांना हवी तशी मागणी नसल्याने व्यापारी देखील फारसे सकारात्मक नाहीत, अशी माहिती फळ व्यापारी अब्दुल्ला खान यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना दिली.