जळगाव - पावसाळ्याला सुरुवात झाली, तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांचा कापूस, मका, हरभरा राज्य सरकारने खरेदी केलेला नाही. खरीप हंगामाच्या पेरणीची वेळ असताना शेतमाल विक्री न झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. सरकारच्या उदासीन धोरणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप करत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात शनिवारी भाजपकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर फेकून राज्य सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. दरम्यान, येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल खरेदी झाला नाही; तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शेतमाल खाली करू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
चाळीसगाव शहरातील सिग्नल चौकात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस व मका येत्या 15 दिवसात खरेदी करण्यात यावा, शेतकी संघात मका खरेदीसाठी करण्यात आलेल्या नोंदणीत टोकन न देता खऱ्या शेतकऱ्यांना डावलण्यात आले असून त्याची सखोल चौकशी करावी, यासह शेतकऱ्यांशी निगडित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भाजपकडून हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा... चीनची आर्थिक नाकाबंदी; अर्थ मंत्रालयाने तयार केला 'हा' प्रस्ताव
चाळीसगाव तालुक्यात कापूस खरेदीसाठी 3 हजार तर मका खरेदीसाठी 1300 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, दीड महिना झाला तरी 25 टक्के शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी झाला नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली पुढारी आणि व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात आहे. त्यामुळे खरे शेतकरी वंचित राहत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर भाजप ते सहन करणार नाही, असा इशारा आंदोलनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.
ठिय्या आंदोलन केल्यानंतर सिग्नल चौक ते शहर पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सरदारसिंग राजपूत, माजी सभापती रवींद्र पाटील, पंचायत समिती सदस्य संजय पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा... मुंबई २६/११ हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेत अटक