हिंगोली - उन्हा तान्हाची जराही पर्वा न करता राब - राब राबणाऱ्या कामगारांनो आपली कामगार कार्यालयात नोंद असणे खुप महत्वाचे आहे. ती नोंद जर असेल ना, तर तुमचे मरणही फुकट नाही. काम करताना आपणास कोणती इजा झाली किंवा नैसर्गिक, काम करता करता जर मृत्यू झाला तर त्याचा ही निधी मिळतो. एवढेच नव्हे तर नोंदणीकृत कामगाराच्या अंत्यविधीसाठी देखील १० हजाराचा निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे नोंदणीकृत कामगारांचे जीवन किती अमूल्य असते हेच यावरून दिसून येते. कामगार दिनानिमित्त वाचा खास रिपोर्ट...
हिंगोली जिल्ह्यात १ मे २०११ मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर २ वर्षे या मंडळाला नोंदणीसाठी काहीच प्रतिसाद मिळाला नाही. २०१४ मध्ये कुठे गती आली अन कामगार नोंदणीचे महत्व कामगारांना कळू लागले. तरीही नोंदणीचा टक्का काही केल्या वाढत नसल्याचे चित्र होते. केवळ १० तर १२ हजार कामगारांचीच नोंदणी झाली होती.
दोन वर्षांपासून कामगार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत कामगार कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्याने कामगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता कुठे हिंगोली जिल्ह्यात २३ हजार ४६ वर नोंदणीकृत कामगारांची संख्या जाऊन पोहोचली. तरीही ही संख्या जिल्ह्याच्या कामगारांच्या संख्येने कमीच आहे.
मुळातच हिंगोली जिल्हा 'ना उद्योग' जिल्हा म्हणून ओळखला जातो. तरीही संख्या कमी असणे म्हणजे अजूनही जिल्ह्यात राबणाऱ्या कामगारांना नोंदणीचे अजिबात महत्व नसल्याचे भयंकर वास्तव असल्याचे दिसून येते. तर कामगारांना दिवसरात्र राबवून घेणारे देखील कंत्राटदार आपल्याकडे कामाला असलेल्या कामगारांची नोंदणी करुन देण्यास टाळाटाळ करत असल्याचे भयंकर वास्तव देखील समोर आले आहे.
मात्र कंत्राटदाराने ही कामगारांच्या नोंदणीसाठी मदत करणे गरजेचे आहे. कार्यालयाकडे नोंदणी जर असेल तर कामगारांच्या प्रत्येक बाबीची दखल घेतली जाते. आज घडीला हिंगोली जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या २३ हजार ४६ पैकी २ हजार ९५१ कामगारांना अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य म्हणून ५ हजार रुपये दिल्याची नोंद आहे. ५०३ कामगारांना विविध योजनेचा लाभ दिला आहे. तसेच ७७ कामगारांना गृहउपयोगी वस्तूऐवजी ३ हजार देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात २ हजार ११० घरेलू महिला राबतात -
हिंगोली जिल्ह्यात घरेलू कामगारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र कामगार कार्यालयाकडे केवळ २ हजार ११० घरेलू कामगार महिलांची नोंद आहे. नोंदणीकृत कामगार असेल्या लाभार्थ्यांला अपंगत्व आल्यास १ लाख रुपये अर्थसहाय नोंदणीकृत लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास १० हजार रक्कम अंत्यविधीसाठी आर्थ्यसहाय्य दिले जाते. नोंदणीकृत कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी किंवा स्त्रिकामगारांच्या विधुर पतीस प्रत्येक वर्षाला ५ वर्षांसाठी २४ हजार रुपये अर्थसहाय्य केले जाते. एवढेच नव्हे तर नोंदणीकृत कामगार असेल तर स्वतःच्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी ३० हजार आशा वेगवेगळ्या १५ योजनांचा लाभ नोंदणीकृत लाभार्थ्यांना मिळू शकतो.
आता यामध्ये वाढ झाली असून २८ प्रकारच्या योजनांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांने कामगार कार्यालयामध्ये नोंदणी करण्याचे आव्हान कामगार दिनानिमित्त सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांने केले आहे. विशेष म्हणजे कंत्राटदराने देखील नोंदणीकृत कामगारांनाच काम दिल्यास निदान नोंदणीचा आकडा वाढण्यास मदत होऊ शकते. आता तर नोंदणीकृत आलेल्या कामगारांना स्वतःचे संरक्षण म्हणून सूटच १० ते १२ प्रकारचे साहित्य दिले जाणार आहे.
ही आहेत आवश्यक कागद पत्रे -
वर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवाशी पुरावा, छायाचित्रासह ओळख पुरावा, बँक पासबुकची सत्य प्रत, पासपोर्ट आकाराची ३ छायाचित्रे अन नोंदणी फी २५, वर्गणी दरमहा फक्त १ रुपया ते ही पाच वर्षांसाठी घेतले जाते.