हिंगोली - संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचाच एक भाग म्हणून, नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात 21 आणि 22 मार्च रोजी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणुला रोखण्यासाठी जनतेने स्वयस्फुर्तीने बंद पाळणे आवश्यक आहे. 21 व 22 मार्च रोजी जनतेने घराबाहेर पडू नये, अशी सूचना त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
बंदमधून या आस्थापनांना वगळण्यात आले आहे:
शासकीय/निमशासकीय कार्यालये, पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रॉलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमे, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना यांना वगळून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने 21 व 22 मार्च रोजी बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.