हिंगोली - शेतकऱ्यांनी दिवस-रात्र एक करून पीक विमा भरला. आवश्यक कागदाची जुळवाजुळव करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. एवढेच नव्हे तर त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चही केला. मात्र, आता नुकसान झाल्यानंतर पीक विमा मिळण्याच्या वेळेत कंपनीकडून संबंधित शेतकऱ्यांना त्रुटी पूर्ण करण्याचे संदेश मोबाइलवर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे. वसमत तालुक्यातील हयातनगर येथील शेतकऱ्यांनी मोठ्या पोटतिडकीने व्यथा सांगितल्या.
संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याचे खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी ही अपेक्षा ठेवून रात्रंदिवस एक करत विमा भरला. तर, विमा कंपनीकडून देखील नुकसानीचे पंचनामे करून विमा वेळेत मिळणे अपेक्षित होते.
हेही वाचा - शेगाव खोडके ग्रामस्थांना पोलिसांच्या धमक्या; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
मात्र, कंपनीकडून विमा तर नाहीच पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला त्यांच्या मोबाईलवर त्रुटी पूर्ण करण्याचे संदेश पाठविलेले आहेत. मोबाईलवर हा संदेश पाहून शेतकऱ्यांचे डोकेच फिरले असून विमा भरण्यासाठी झालेल्या वेदना शेतकरी मोठ्या पोट तिडकीने सांगताहेत.
हेही वाचा - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; टोकाई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात
खरंतर खरीप हातचा गेला आणि मुसळधार पावसाने रब्बी देखील लांबणीवर गेली. अशा भयंकर परिस्थितीमध्ये सध्या शेतकरी सापडला असताना, विमा कंपनीने देखील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे.
हेही वाचा - टी- सिरीज कंपनीच्या अलबममध्ये झळकणार हिंगोलीचे दोन चिमुकले