हिंगोली - दिल्लीतील तुघलकाबाद येथे असलेले सहाशे वर्षापूर्वीचे गुरू रविदास यांचे मंदिर दिल्ली सरकारने तोडले. त्यामुळे हे मंदिर परत बांधण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. यावेळी जिल्ह्यातील चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चर्मकार समाजाचे आराध्यदैवत असलेले संत रोहिदास यांचे मंदिर पडल्याने चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या गेलेत. त्या मंदिराची 12 एकर जागा पंधराशे वर्षांपूर्वी राजा सिकंदर लोथी यांनी संत रोहिदास यांच्या विचारांना प्रेरित होऊन दान दिली होती. त्या जागेवर एक मंदिर आणि एक लहान तलाव खोदण्यात आला होता. मात्र, आता हे मंदिर पाडण्यात आले असून तलावही बुजला जात आहे. या सर्व प्रकाराने चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
त्यामुळे हे मंदिर उभारून बारा एकर जागा ताब्यात देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदना द्वारे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्मकार समाजातील बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.