हिंगोली - जिल्ह्यातील टनका येथील पैनगंगा नदीवर पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाल्याची घडना घडली होता. या घटनेनंतर तब्बल 28 ते 30 तासानंतर संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाने मृतदेह शोधून काढला. शंकर भोयर असे मृताचे नाव आहे. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. यावेळी त्याच्या नातेवाईकांनीही आक्रोश केला. तर घटनास्थळी आमदार तान्हाजी मुटकुळे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि अगद सुडके यांच्यासह वाशिम ग्रामीण पोलीस दाखल होते.
हेही वाचा - बीडमध्ये मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी एकाची जलसमाधी
देवठाण भोयर येथील शंकर भोयर हा रविवारी पहाटे सहाच्या सुमारास आपल्या मित्रासमवेत टनका येथील पैनगंगा नदीच्या कट्ट्यावर पोहण्यासाठी येत असे. नेहमीप्रमाणे चार ते पाच मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. त्याने एक दोन वेळा उडी घेतली. तो बाहेर ही आला. मात्र, त्याने पुन्हा उडी घेतल्यानंतर तो बाहेर आलाच नाही. यानंतर त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्याच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांनी ही माहिती ग्रामस्थांना कळविली. दिवसभर शोध घेतल्यावरही तो आला नव्हता.
हेही वाचा - परळी पोलिसांनी पकडला ३५ लाखांचा गुटखा; खरे सूत्रधार मोकाटच
पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव व शोध पथकाने दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध कार्य सुरू केले. यावेळी अखेर २८ ते ३० तासांनंतर नदीच्या कडेला शंकरचा मृतदेह आढळून आला. याचवेळी भावनेच्या भरात शंकरच्या चुलत भावाने नदीत उडी घेत मृतदेहाकडे धाव घेतली. यात तो बुडू लागल्याने ही बाब बचाव पथकातील कॅप्टनच्या लक्षात आली आणि त्याला देखील वाचविण्यात आले. शंकरचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याला अखेरच पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती. पैनगंगा नदी ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असल्याने दोन्ही भागातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर बचाव पथकाने केलेल्या कार्याचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आभार मानत कौतुक केले.
हेही वाचा - नगर-पुणे महामार्गावर मिनी बसला अपघात; एकाच कुटुंबातील 2 ठार, १५ जखमी
शंकर हा उत्कृष्ट कुस्तीपटू होता. त्याला व्यायामाची प्रचंड आवड असल्याने तो नेहमीच पोहण्यासाठी जात असे. चार महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. या घटनेची समस्त ग्रामस्थांना माहिती झाली होती. मात्र, शंकरच्या आई-वडील आणि पत्नीला या घटनेची कल्पना देण्यात आली नव्हती. शंकर हा गावातील कुणीतरी आजारी असल्याने तिकडे गेल्याचे घरी सांगण्यात आले होते.
या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली तर गावावर शोककळा पसरली आहे. तर या दुर्घटनेवरून एक गोष्ट प्रकर्षाने समोर आलीय की, अशा घटनासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्र सामग्राी किंवा कोणती टीम उपलब्ध नाही. त्यामुळेच बाहेरील एका सेवाभावी संस्थेचा आधार घ्यावा लागला.