गोंदिया - शहरातील सगळे वाहतूक सिग्नल गेल्या एक वर्षापासून बंद पडलेले आहेत. यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता शहराच्या मुख्य मार्गांवर वाहतूक सिग्नल लावण्यात आले आहे. त्याच्या दुरूस्तीचे काम नगरपरिषदेने करणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या एक वर्षापासून जयस्तंभ चौक, नेहरू चौक, शक्ती चौक या मुख्य मार्गावरील वाहतूक सिग्नल बंद पडले आहेत. तसेच जयस्तंभ चौकातील एका सिग्नलला अज्ञात ट्रकने धडक दिल्यामुळे तो सिग्नलही बंद पडला आहे. त्याचीही अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे शहरात ट्रॉफिक जाम आणि अपघात या सारख्या समस्या निर्माण होत आहे.
प्रशासनाने बालाघाट टी-पाईंट, कुडवा नाका, फुलचुर नाका, कलेक्टर चौक तसेच मरारटोली बसस्टॉप जवळ ५ नवीन सिग्नल लावले आहेत. मात्र, ते सिग्नलही बंद पडलेले आहेत. वाहतूक विभागाकडून सिग्नल लावले जातात पण त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे ते काही दिवसातच बंद पडतात. ही परिस्थिती शहरात पाहायला मिळत आहे. सिग्नलला सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाने अनेकदा नगरपरिषदला पत्र व्यवहार केला. मात्र, नगरपरिषदेने आचार संहिता असल्याचे कारण देत याकडे दुर्लक्ष केले. या सर्व प्रकारामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाला कोण जबाबदार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.