गडचिरोली - जिल्हा हा पारंपरिक धान उत्पादक जिल्हा. मात्र जिल्ह्यात गोसीखुर्द धरणाच्या महापुराने यंदा कहर केला. महापुरात धानशेती उद्ध्वस्त झाली. शेतकरी हताश होते. मात्र हताश झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने करडई तेलबिया पिकाची निवड करत नवा पर्याय दिला. हा पर्याय शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरला आहे.
![oilseed crop](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gad-farmer-story-mh10039_19032021133612_1903f_1616141172_317.jpg)
आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्राने पुरविले बियाणे व कृषी तंत्र सहाय्य
यंदा विदर्भातील काही जिल्ह्यात निसर्गाच्या कोपापेक्षा गोसीखुर्द धरणाच्या मानवनिर्मित महापुराने होते नव्हते ते वाहून नेले. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसला. उभे धानपीक वाहून गेले अथवा सडले. यानंतर या शेतकऱ्यांपुढे हंगाम कसा निभावा असे संकट उभे ठाकले. कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली आणि आत्मा यांनी संयुक्तपणे अशा शेतकऱ्यांसाठी करडई तेल बिया पिक सुचविले. यासाठी सुमारे दोनशे शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यात आले. सोबतच कृषी तंत्र सहाय्य देखील पुरविण्यात आले. परिणामी या शेतकऱ्यांच्या शेतावर करडईचे उत्तम पीक आले असून यामुळे शेतकऱ्यांना तेलबिया पिकाचे नवे आकाश खुले झाले आहे.
काटेरी पिकामुळे वन्यप्राण्यांचा त्रास नाही
महापुराने शेतीतील सर्वस्व गमावल्यानंतर हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी करडई पीक हाती आल्यानंतर समाधान व्यक्त केले आहे. हे पीक काटेरी असल्याने यात जनावरे शिरत नाही. त्यामुळे वन्यजीवांचा धुडगूस थांबला असून कोरडवाहू शेतीतदेखील उत्तम उत्पादन येत असल्याने शेतकऱ्यांनी पुढच्या काळातही करडई पीक घेण्याकडे कल दर्शविला आहे.
बाजाराची निर्मिती व प्रत्यक्ष तेल काढण्यासाठी व्यवस्था
गडचिरोली जिल्ह्यात करडई उत्पादन होत नाही. मात्र आता दोनशे शेतकऱ्यांनी उत्तम करडई तेलबिया पीक उत्पादन घेतल्याने त्यांच्यासाठी बाजाराची निर्मिती व प्रत्यक्ष तेल काढण्यासाठी व्यवस्था उभारली गेली आहे. गडचिरोलीच्या पोर्ला येथे सामुदायिक सुविधा केंद्रात या शेतकऱ्यांकडून तेलबिया घेत नाममात्र दरावर तेल काढून दिले जाणार आहे. या तेलाला उत्तम मागणी व भाव असल्याने स्थानिक स्तरावरदेखील तेल विकले जाऊ शकते.