गडचिरोली - राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात राज्याच्या एकूण वनक्षेत्रापैकी 76 टक्के वनक्षेत्र एकमेव गडचिरोली जिल्ह्यात आहे. वनक्षेत्रात कोणताही मोठा प्रकल्प उभारायचा झाल्यास पर्यायी वनीकरण करणे गरजेचे आहे. असे असले तरी गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत कोणताही मोठा प्रकल्प उभा न झाल्याने पर्यायी वनीकरण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. पर्यायी वनीकरण झाले नसले तरी शासनाकडून पर्यायी वनीकरण योजनेसाठी दरवर्षी निधी दिला जातो. यामध्ये अनेक लहान-मोठे उपक्रम राबवले जात असल्याने आतापर्यंत जवळपास 2 कोटी 94 लाख रुपये खर्च झाल्याची माहितीही गडचिरोलीचे विभागीय वनाधिकारी यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यात 16 हजार 417.59 चौरस किलोमीटर भौगोलिक वनक्षेत्र
गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 76 टक्के वनक्षेत्र जिल्ह्यात आहे. गडचिरोली वनवृत्ताचे भौगोलिक वनक्षेत्र 16 हजार 417.59 चौरस किलोमीटर आहे. गडचिरोली वनवनवृत्तामध्ये 5 वनविभाग असून आल्लापल्ली वनविभागात 2580.25 चौरस किलोमीटर, सिरोंचा वनविभागात 2777.791 चौरस किलोमीटर, भामरागड वनविभागात 3747.526 चौरस किलोमीटर, गडचिरोली वनविभागात 2206.59 चौरस किलोमीटर तसेच वडसा वनविभागात 1513.05 चौरस किलोमीटर वनक्षेत्र असे 12 हजार 825.207 चौरस वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे.
11 हजार 227.195 चौरस किलोमीटर राखीव वनक्षेत्र तर 1403.053 चौरस किलोमीटर संरक्षित वनक्षेत्र
गडचिरोली वनवृत्तातील अल्लापल्ली वनविभागात 2226.671 चौरस किलोमीटर राखीव वनक्षेत्र तर 220.400 संरक्षित वनक्षेत्र आहे. सिरोंचा वनविभागात 2648.498 चौरस राखीव वनक्षेत्र तर 128.993 चौरस किलोमीटर संरक्षित वनक्षेत्र आहे. भामरागड वनविभागात 3370.146 राखीव वनक्षेत्र तर 376.160 चौरस किलोमीटर संरक्षित वनक्षेत्र आहे. गडचिरोली वन विभागात 1870.800 चौरस किलोमीटर राखीव वनक्षेत्र तर 281.700 चौरस किलोमीटर संरक्षित वनक्षेत्र आहे. वडसा वनविभागात 1110.780 चौरस किलोमीटर राखीव वनक्षेत्र तर 395.800 चौरस किलोमीटर संरक्षित वनक्षेत्र आहे.
2 कोटी 94 लाख 65 हजाराचा निधी खर्च
गडचिरोली वनवृत्तातील पाचही वनविभागामध्ये पर्यायी वनीकरणाच्या कामासाठी आजपर्यंत 2 कोटी 94 लाख 65 हजार रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये नव्या झाडांची लागवड करणे, कर्मचाऱ्यांसाठी निवास्थान बांधकाम, रोपवाटिकेची निघा राखणे अशी अनेक लहान कामे करण्यात आली आहेत.