धुळे- पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटून आलेला भारतीय सैन्य दलातील जवान चंदू चव्हाण याने सैन्य दलातील त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. चंदू चव्हाण याने आपला राजीनामा डी.एम रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. पाकिस्तानातून सुटून आल्यापासून सैन्य दलाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, मला वाईट वागणूक मिळत असल्याचे सांगत या त्रासाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे चंदू चव्हाण याने सांगितले आहे.
![dhule](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4656703_thumbnai.jpg)
चंदू चव्हान हा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावातील रहिवासी आहे. तो भारतीय सैन्य दलातील ३७ राष्ट्रीय रायफल्सचा जवान आहे. त्याने भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर त्याला भारतात परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. या घटनेच्या चौकशीदरम्यान चंदूने भारतीय लष्करी आस्थापनांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन आपण पाकिस्तानविरोधातील संतापातून हे कृत्य केल्याचे सांगितले होते.
![dhule](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4656703_thu.jpg)
हेही वाचा- धुळे: शिरपूर तालुका पोलिसांकडून 72 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त
सीमावर्ती भागात तैनात एखाद्या तुकडीमध्ये असा काही प्रकार घडला तर केवळ संबंधित व्यक्तीच नव्हे, तर तुकडीतील जबाबदार अधिकाऱ्यांवरही वेगवेगळ्या स्वरूपात कारवाई होते. लष्कर संपूर्ण चौकशीअंती कारवाईचे स्वरूप निश्चित करते. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत लष्करी न्यायालयाने चंदूला ८९ दिवसांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगल्यानंतर त्याची अहमदनगर येथील लष्करी आस्थापनेत बदली करण्यात आली होती.
हेही वाचा- सुरत-नागपूर महामार्गावर तिहेरी अपघात, 1 ठार
मात्र याठिकाणी आल्यापासून सैन्य दलात मला वाईट वागणूक मिळत असून माझ्याकडे वाईट नजरेने बघितले जात आहे. सातत्याने मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे मी अपमानित होत आहे. यामुळे मी सैन्यात नियमित येऊ शकत नसल्याचं सांगत चंदू चव्हाण याने डी.एम रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. चंदू चव्हाण याच्या राजीनाम्यामुळे भारतीय सैन्य दलात खळबळ उडाली आहे. चंदू चव्हाण याच्या राजीनाम्यावर भारतीय सैन्य दलातील अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.