चंद्रपूर - सकाळी फिरायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार ( Woman Killed in Tiger Attack ) केले. ही घटना पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा गावात घडली. संध्या विलास बावणे असे मृत महिलेचे नाव आहे.
पोंभुर्णा तालुक्यात ( Porbhurna Taluka ) मागील काही महिन्यांत मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. अनेक लोकांवर येथे वाघाने हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्याचीच पुनरावृत्ती गुरुवारीही घडली. सकाळच्या सुमारास संध्या विलास बावणे (वय 35) ही महिला फिरायला गेली असता पोंभुर्णा मार्गावरील डॉ. पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. सकाळच्या सुमारास आजूबाजूला काही मुले होती. त्यांनी आरडाओरडा केली. मात्र या वाघाच्या हल्ल्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर वाघाने पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला असून पूढील चौकशी सुरू आहे. या महिलेला दोन मुले होती. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.