चंद्रपूर - जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका डोंगर दऱ्यांनी वेढला गेला आहे. याच्या एका बाजूने उंच डोंगर तर दूसऱ्या बाजूने खोल गेलेली दरी असे काहीसे दृष्य येथे पाहायला मिळते. सध्या निसर्गाने जिवती तालुक्यावर मुक्त उधळण केली असून डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू पांघरलेले निसर्गाचे देखणे रूप डोळ्यात भरणारे आहे. मात्र, हे दृष्य बघायला जितके सुंदर तितकेच ते धोकादायकही ठरत आहे. या मार्गातील दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या वृक्षांच्या फांद्या प्रवाशांना ये जा करताना अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जिवती तालुका गाठण्यासाठी माणिकगड आणि भेंडावी ही २ प्रमुख मार्ग आहेत. या मार्गाच्या एका बाजूने उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूने खोल दरी असून हा मार्ग अतिशय अरुंद आहे. जिवती आणि पाटण ही गावे गाठण्यासाठी याच मार्गाने जावे लागत असून या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्यापही झालेले नाही. त्यामुळे रुंदीकरणाअभावी स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
हेही वाचा - चंद्रपूर: लाठी वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला वाघ; दोन महिन्यात दोन वाघांचा मृत्यू
जिवती, पाटणकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन्ही बाजूंनी असलेल्या वृक्षांच्या फांद्यानी मार्ग झाकोळला गेला आहे. परिणामी या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर, २ वाहने समोरासमोर आल्यावर वाहनांना मार्ग देण्यासही मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच जिवती ते गडचांदूर आणि गडचांदूर ते पाटण हा रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. तर, या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करित असल्याचा आरोप आता केला जात आहे.
हेही वाचा - वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून वेकोलीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू