चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात एक वाघीण आणि तिचे 2 बछडे मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचे समोर आले आहे. मोहाच्या दारूनिर्मितीत वाघीण आणि तिचे बछडे अडसर ठरत असल्याने हा विषप्रयोग केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली आहे.
कोरोनाच्या ताळेबंदीमुळे बाहेरून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या दारूला मोठा लगाम बसला. त्यामुळे मोहफुलापासून तयार होणाऱ्या दारूला मोठी मागणी आली. त्यानुसार जंगल परिसरात असे अनेक दारूनिर्मितीचे अड्डे तयार झाले. जंगलात मोहफुले सहज उपलब्ध होत असून लपण्यासाठी देखील हा परिसर उपयुक्त आहे. अशाच प्रकारची दारूनिर्मिती ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या सितारामपेठ बिटात सुरू होती. कोंडेगाव या गावाजवळील जंगल परिसरात दारूची मोठी निर्मिती केली जायची. मात्र या परिसरात एक वाघीण ठाण मांडून बसली होती.
बछडे झाल्यावर वाघिणीची हालचाल मर्यादित होते. उन्हाळा असल्याने ही वाघीण या तळ्याच्या परिसरातच राहत होती. त्यामुळे दारू तयार करण्यास ह्या वाघिणीचा भय होता. यावर आरोपींनी अत्यंत क्रूर उपाय शोधून काढला. त्यानुसार वाघीण आणि तिच्या बछड्यांना संपविण्यासाठी सुनियोजित कट रचला गेला. मोहसडवा टाकून त्यात थिमेत नावाचे विष टाकण्यात आले. त्याचे सेवन केल्याने रानटी डुकराचा मृत्यू झाला. या मृत पावलेल्या डुकराला वाघिणीच्या ठिकाणावर टाकण्यात आले. त्याचे सेवन केल्याने वाघीण आणि दोन्ही बछड्यांचा मृत्यू झाला.
10 जूनला तलावाजवळ वाघिणीचा मृतदेह आढळून आला तर 14 जूनला काही अंतरावर 2 बछडे मृतावस्थेत आढळून आले. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. कारण शिकारीच्या दृष्टीने ताडोबा हा अत्यंत सुरक्षित व्याघ्रप्रकल्प समजल्या जातो. या परिसरात दारूची निर्मिती होणे, वाघिणीवर विषप्रयोग होणे ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेत भर टाकणारी आहे. दारूमुुळे वाघांना संपविण्याचा हा पहिलाच प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सूर्यभान ठाकरे, श्रावण मडावी, नरेंद्र दडमल या आरोपींना अटक करण्यात आली आहे.