मुंबई - अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराजयाला घाबरुन शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्याची टीका केली होती. याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बालबुद्धीने विधाने करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले आहे.
मुंबईतील रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढणे अतिशय चिंताजनक आहे. यावर प्रशासनाने सामूहिकरित्या विचार करणे आवश्यक आहे. पूल दुर्घटना दुर्दैवी असून याच पुलाचे आधी ऑडिट झाल्याची माहिती मिळत आहे. आता या घटनेनंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. सरकारने या दुर्घटनेबाबत श्वेत पत्रिकाच काढावी असेही पवार यांनी यावेळी सांगितले.देशात बुलेट ट्रेनवर सव्वा लाख कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा इतर रेल्वेच्या पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत असेही पवार यावेळी म्हणाले.
काटोलमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक घेण्याची काही आवश्यकता नाही. सर्व पक्षानी याचा विचार करावा. आचार संहितेमुळे निवडूण येणाऱ्या आमदाराला केवळ तीन ते चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे, मग यंत्रणा राबवणे उचित होईल का असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.