मुंबई - मुंबईत गेले चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. पाणी साचल्याने रस्ते आणि ट्रेनची वाहतूक ठप्प पडली. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. मात्र त्यानंतरही मुंबई तुंबली नसल्याचा अजब दावा करत मुंबई तुंबण्याला मुंबईकर आणि निसर्गाला दोषी ठरवले आहे.
मुंबईमधील पावसाची माहिती देण्यासाठी महापालिकेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत पालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे यांनी मुंबई तुंबली नसल्याचा दावा केला आहे.
मुंबईत गेले चार दिवस पाऊस पडत असल्याचा पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना जून महिन्यात जितका पाऊस पडणे अपेक्षित होते त्याच्या ८५ टक्के पाऊस गेल्या चार दिवसात पडला आहे. या पावसादरम्यान काही ठिकाणी समुद्राला भरती आणि निप टाईड असल्याने पाणी साचले होते. समुद्रातील भरती गेल्यावर पाण्याचा निचरा झाला. कांजूरमार्ग येथे एका विकासकाने नाल्याजवळ डेब्रिज टाकल्याने पाणी साचले होते. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. सायन मुख्याध्यापक नाला येथे नागरिकांनी टाकलेला प्लास्टिकचा कचरा पाणी उपासणाऱ्या पंपामध्ये अडकल्याने पंप काहीवेळ बंद पडल्याने पाणी साचले. मुंबईकरांनी नाल्यात कचरा टाकला नाही तर असे प्रकार होणार नाही, असे सांगत उपायुक्त चोरे यांनी मुंबईकरांवर जबाबदारी झटकली. तर समुद्राला भरती आणि ओहोटीमधील अंतर कमी असलेली 'नीप टाइड' दोन दिवस होती यामुळे पाणी साचले. शहरातील भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साचल्याचे सांगत चोरे यांनी निसर्गाला दोषी ठरवले.
चार दिवसात ८५ टक्के पाणीसाठा -
गेल्या वर्षी जून महिन्यात कुलाबा येथे ७९४ मिलीमीटर पाऊस पडला होता. यावर्षी गेल्या चार दिवसात ४३३ मिलीमीटर इतका पाऊस पडला. मागील वर्षी सांताक्रूझ येथे ७९४ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. यावर्षी चार दिवसात ६०७ मिलीमीटर इतका पाऊस पडला. हा पाऊस मागील वर्षांपेक्षा ८५ टक्के आहे असे चोरे यांनी सांगितले.
हिंदमाता मध्ये झाडांची अडचण -
हिंदमाता येथे दरवर्षी पाणी साचते. ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनला पाणी पोहचावे म्हणून मायक्रो टनेलिंगचे काम सुरु आहे. त्या ठिकाणची ५२ झाडे या कामासाठी अडथळा ठरत आहेत. या झाडांचं पुनर्रोपण करण्याचा निर्णय पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला घ्यायचा आहे. न्यायालयात वृक्ष प्राधिकरणाबाबत केस सुरु आहे. ही केस संपल्याने त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे चोरे यांनी सांगितले.