बुलढाणा: राज्यात शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या अडचणी न सोडवता, तुम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. आधी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा आणि मगच कामाख्या देवीच्या दर्शनाला जा, देवी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल, अशी प्रखर टीका स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारमधील मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जाणार असल्यामुळे केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जलसमधी आंदोलन: शेतकरी नेते रविकांत हे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जलसमधी आंदोलन करण्यासाठी मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. सोबत अनेक गाड्या आणि कार्यकर्ते असून सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा. यासाठी हे आंदोलन असून आपण आंदोलनावर ठाम असल्याचे तुपकर यांनी सांगितले आहे.
मुंबईकडे कूच: रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. रविकांत तुपकर शेतकऱ्यांसह बुलढाणा शहरातील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथून आज सकाळी मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांचा जाण्याचा मार्ग बुलढाणा शहर- धाड-भोकरदन-सिल्लोड-छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)-अहमदनगर-चाकण- लोणावळा असा सांगण्यात येत आहे. 23 नोव्हेंबर रात्रीचा मुक्काम पनवेलमध्ये करणार आहेत व 24 नोव्हेंबरच्या सकाळी 10.00 वा. मुंबईत मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असा इशारा देण्यात आला आहे.
सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे तुपकरांचा आंदोलनाचा इशारा: सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खाजगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8,500 रुपये तसेच कापसाचा भाव प्रति क्विंटल12,500 रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारने धोरण आखावं, यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत.
जलसमाधी घेणार असल्याचा इशारा: सरकारने सोयाबीन, कापूस आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष केल्यामुळे रविकांत तुपकर यांनी मुंबईच्या मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात 24 नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनाची आता चांगलीच तारांबळ उडालेली आहे. रविकांत तुपकर मात्र आंदोलनावर ठाम असल्यामुळे सरकार आणि तुपकरांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.