बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या केळवदचे प्रयोगशील शेतकरी संतोष गायकवाड यांनी पारंपरिक पद्धतीने यंदा रब्बीच्या हंगामात हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र हरभऱ्याचे पीकाला मुळकुंज या रोगाने फस्त केले. त्यामुळे उत्तर भारतात प्रामुख्याने घेतले जाणारे राजमा पीक जे आता बीड, सातारा, सांगली सारख्या पश्चिम महाराष्ट्रात देखील घेतले जात आहे. ते पाहून विदर्भात देखील या प्रयोगशील शेतकऱ्याने हरभऱ्याला पर्याय म्हणून आपल्या शेतात राजमाची लागवड केली आहे. यातून त्यांना चांगला नफा मिळण्याची आशा आहे.
2 लाख 90 हजार रुपयांच्या उत्पन्नाची शक्यता : पाण्याची उपलब्धता चांगली असेल तर साधारणपणे अडीच महिन्याचे हे पीक आहे. शेतकऱ्याला आपल्या प्रति एकर 6000 रुपये प्रमाणे एकूण 30 हजार रुपये उत्पादन खर्च पाच एकरामध्ये या राजमाची लागवड करताना आला आहे. एका एकरात आठ क्विंटल राजमा तर पाच एकरात तब्बल 40 क्विंटल राजमा पिकाचे उत्पादन हा प्रयोगशील शेतकरी घेणार आहे. तब्बल 110 रुपये प्रति किलोचा भाव किरकोळ बाजारात राजमा पिकाला मिळत आहे. त्यामुळे 1 क्विंटलला 8000 रुपयांचा जर का हिशोब धरला तरी चाळीस क्विंटलला या शेतकऱ्याला अडीच महिन्यात तीन लाख वीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. त्यातून उत्पादन खर्च 30,000 रुपये वजा केल्यास तब्बल अडीच महिन्यात हा शेतकरी 2 लाख 90 हजार रुपयांचा धनी शेतकरी होतोय. ज्यातून अगदी सहजपणे हा शेतकरी आपली आर्थिक सुबत्ता साधू पाहत आहे.
राजमा पिकाची लागवड करावी : अत्यंत सोप्या पद्धतीने हरभऱ्याप्रमाणेच या राजमा पिकाची लागवड करावी लागते. शिवाय कुठल्याही रोगराईची या पिकाला भीती नाही. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात राजमा पिकाची लागवड पुढच्या वर्षी प्रचंड प्रमाणात विदर्भात होण्याची शक्यता आहे. ज्यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. रब्बीचा हंगाम म्हटला तर गहू, कांदा आणि हरभरा ही पारंपरिक पिके आलीच. पश्चिम विदर्भात तर शेतकरी नित्यनेमाने हरभऱ्याची, गव्हाची त्याचबरोबर कांद्याची लागवड करतो. मात्र रोगराईमुळे हरभरा, कांदा पिकाला शेतकऱ्याला पाहिजे तसा दर मिळत नाही. गव्हाची परिस्थिती काही वेगळी नाही. मात्र केळवदच्या या प्रयोगशील शेतकऱ्याने उत्तर भारतातील राजमाचे पीक आपल्या शेतात घेऊन पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना एक नवा संदेश दिला आहे.
उत्पादित मालाला योग्य भावाची गरज : विदर्भातील सातत्याने होत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला सरकारला योग्य असा उत्पादन खर्च अधिक नफा अशी भाव वाढ द्यावी लागेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांची ही जबाबदारी आहे, त्यांनी केळवदच्या या संतोष गायकवाड सारख्या कृतिशील शेतकऱ्याप्रमाणे आपल्या शेतात रब्बीचा हंगाम असो वा खरीपाचा. या पारंपरिक पिकाबरोबर नवीन प्रयोग करत आपली आर्थिक सुबत्ता स्वतः साधायची आहे. हेही तेवढेच खरे.
हेही वाचा : Kolhapur Love Story: वयाच्या सत्तरीत जुळले मन, अन् थाटात झालं लग्न; शिरोळ तालुक्यातील प्रेम कहाणी