भंडारा - येथील मोहाडी तालुक्यात पेंच प्रकल्पातील कालव्यावरील तब्बल १०० झाडांची अवैध कत्तल करण्यात आली आहे. मात्र, तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांनीच झाडे कापली तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. या अवैध वृक्षतोडीने शासनाच्या 33 कोटी वृक्ष लावण्याच्या स्वप्नाला अधिकारी काळिमा फासत आहेत.
नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पातील पाणी भंडारा जिल्ह्यातील काही गावांना मिळावे, त्याकरिता कालवे तयार करण्यात आले आहेत. या कालव्यावर हजारोंच्या संख्येने झाडे आहेत. मात्र, ही झाडे चोरीच्या मार्गाने तोडली जात आहेत. पांढराबोडी ते सीतेपार या गावावरून पेंच प्रकल्पातील कालवे गेले असून या कालव्यांवर १०० वर वेगवेगळ्या जातीची मोठी झाडे होते. ती झाडे आता नाहीशी झाली आहेत.
शासनातर्फे कोणतीही लिलाव प्रक्रिया न करता ही अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. कांद्री पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष गजानन झंझाड यांनी या कालव्यावरील झाडे कापण्यात अली असल्याची तक्रार अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र, तरीही अधिकारी त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई केली नाही. त्याउलट प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
ही झाडे जवळपास 50 वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यांना तोडण्याची काहीच आवश्यकता नव्हती. मात्र, तरीही ही झाडे तोडल्या गेली. त्यामुळे, या झाडांची कटाई अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाली असावी अशा संशय या ठिकाणी उपस्थित झाला आहे. झाडे हे पर्यावरणाला पूरक ठरतात मात्र तरीही झाडांची अवैध वृक्षतोड करण्यात आल्याने, अशा दोषी अधिकारी व कटाई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
१ जुलैपासून ३० जुलैपर्यंत शासन वृक्षारोपण कार्यक्रम राबविणार आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न महाराष्ट्र शासनाचे आहे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. आजपर्यंत जंगलाची आणि इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला. हा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र शासन वृक्षांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. शासन एकीकडे वृक्ष वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे काही स्वार्थी लोक आणि अधिकारी शासनाच्या संकल्पावर पाणी सोडत आहेत. अशा भ्रष्ट लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.