भंडारा - तांदुळ (धान) उत्पादक जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. येथील प्रसिद्ध चिन्नोर तांदळाला देश-विदेशात पोहोचवण्यासाठी त्याचे भौगोलिक मानांकन करून विक्री केली जाणार असल्याची माहिती भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी दिली आहे. पुढच्या खरिपात जवळपास दीडशे एकरात याची लागवड व पॅकिंग करून देश-विदेशात पोहोचविण्याच्या दृष्टीने हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल असेल. त्यामुळे, चिन्नोर वाणाचे ब्रँडिंग होऊन शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ आणि त्यांच्या तांदळाला योग्य दर मिळेल, या उद्देशाने ही संकल्पना पुढे आणली जात असल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात उत्पादन केलेल्या तांदळाला महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात मागणी आहे. त्यातच विशिष्ट सुगंध आणि चवीसाठी चिन्नोर तांदळाला अधिकच मागणी आहे. मात्र, भौगोलिक मानांकन नसल्याने त्याचे योग्य ब्रँडिंग होत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा फायदा मिळत नाही. म्हणून या वानाला जी.आय मानांकन मिळवून देण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लाखनी तालुक्यात शेतकऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या धानाला योग्य दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आणि त्यातून जी.आय मानांकन याचा विषय पुढे आला. लाखनीचे प्रगतशील शेतकरी अशोक गायधने यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प भंडारा जिल्ह्यात साकारला जाणार आहे.
जी.आय मानांकनामुळे भंडारा जिल्ह्यातील उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील आंबेमोहर आणि आजरा घनसाळ या जातीच्या तांदळाला जी.आय मानांकन मिळाले आहे. चिन्नोर तांदळाला जी.आय मानांकन मिळवून देण्यासाठी पुण्यातील बौद्धिक संपदा आणि भौगोलिक मानांकन विषयाचे अभ्यासक प्राध्यापक गणेश हिंगमिरे हे सहकार्य करणार आहेत. मागच्या आठवड्यात यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली असून त्यानुसार जिल्हा कृषी विभागाने भंडारा जिल्हा अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव लवकरच चेन्नई येथे पाठवला जाईल आणि तेथे भौगोलिक मानांकन मिळेल, असे खासदार सुनील मुंढे यांनी सांगितले.
जिल्ह्यात सुरुवातीपासूनच चिन्नोर जातीच्या वाणाचे उत्पादन घेतले जात होते. मात्र, त्याला जिल्ह्यात मिळणारा दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी याचे उत्पादन घेणे कमी केले. आता पुन्हा शेतकऱ्यांना चिन्नोर लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. यासाठी शेतकऱ्यांना बिजाईसुद्धा दिली जाईल. यावर्षी जवळपास दीडशे एकरात चिन्नोरची लागवड करण्याचा उद्देश आहे आणि हा सर्व उत्पादन सेंद्रिय पद्धतीने करून निर्यातक्षम उत्पादन घेण्यात येणार आहे. तसेच, त्याची जिल्ह्यातच पॅकिंग करून देश विदेशात विक्री करणार आहे. हे सर्व कार्य शेतकरी उत्पादन गटाच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल. त्यामुळे, शेतकऱ्यांना चिन्नोर तांदळाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधता येईल, असे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.