भंडारा- जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवसापासून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यात मागील सहा दिवसात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे परे हे धोक्यात आले होते. या पावसामुळे त्या पर्यांना नक्कीच जीवनदान मिळणार आहे.
मागील आठ दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. दोन दिवसाअगोदर हवामान खात्याने मुसळधार पाऊस महाराष्ट्रात सर्वदूर बरसेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, या दोन्ही दिवसात किंवा मागील सहा दिवसात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपेक्षित पाऊस पडलाच नाही. त्यामुळे केवळ निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकरी चिंतेत पडले होते. शेतातील परे कसे वाचवायचे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता. रविवारी बरसलेल्या या मुसळधार पावसामुळे यांना जीवदान मिळाले आहे.
रविवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस येईल अशी कुठलीही शक्यता नव्हती. सायंकाळी चार नंतर वातावरणात अचानक बदल झाला पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला रिमझिम बरसणारा पाऊस दहा मिनिटानंतर मुसळधार बरसू लागला. विजांच्या गडगडाटासह हा पाऊस जवळपास एक तास जोरदार बरसत राहिला या दमदार पावसामुळे नाल्या तुडुंब भरून रस्त्यावर पाणी वाहत होता. तसेच छोटे छोटे नाले तुडुंब भरून वाहत होते तर काही नाण्यांवरून पाणी वाहत होता.
खरंतर या पावसाची वाट शेतकरी मोठा आतुरतेने पाहत होता. ज्यांची शेती केवळ निसर्गावर अवलंबून आहे, असे शेतकरी पावसाची वाट पाहत होते. पावसामुळे केवळ पर्यांना नवीन जीवदान मिळणार नाही तर शेतकरी शेतात पाणी असल्यास चिखलणी करून रोवणीला ही सुरुवात होणार आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळणार आहे शेतकरी काल झालेल्या पावसामुळे आनंदित झालेले आहेत.