परळी (बीड) - समाजाला अज्ञान, घृणा आणि भौतिकवादाच्या अंधःकारातून वाचविणे तसेच शांती, एकात्मता आणि समाजाची प्रगती व्हावी, या उद्देशाने जमात-ए- इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 'अंधारातून प्रकाशाकडे' हे राज्यस्तरीय प्रबोधन अभियान २२ जानेवारीपासून राज्यभर राबविण्यात येणार आहे, असे संघटनेतर्फे सांगितले आहे. संघटनेचे भारतीय समाज विभागाचे सहायक सचिव मोहम्मद शफी फारूखी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
हेही वाचा - 5 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या नोव्हेरा शेखला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
इस्लाम धर्माविषयी गैरसमजुती दूर करणार
या अभियानातून इस्लाम धर्माविषयी सामान्य नागरिकांच्या मनातील गैरसमजुतीही दूर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे. 'कोरोना महामारीने भौतिकवादी लोकांचे डोळे उघडले आहे. या स्थितीमुळे त्यांचे सध्याचे विश्वास आणि कार्यशैलीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. म्हणून जीवन म्हणजे फक्त संपत्ती गोळा करणे नाही व भौतिक उद्देशांची परिपूर्ती एवढाच याचा उद्देश नाही. शेवटी विवेक आणि करुणेशिवाय कुठलेही सुख नाही, असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे,' हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
५० हजार नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवणार
२२ ते ३१ जानेवारी दरम्यान शहरातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयाला भेटी देणे, युवा व युवतींना माहिती देणे, वृद्धाश्रम व शहर व तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंच्या भेटी, सामाजिक व राजकीय व्यक्तीच्या भेटी, शाळा-महाविद्यालयांना भेटी, महिलांना विशेष मार्गदर्शन तसेच पुस्तक प्रदर्शन व डाॅ. रफीक पारनेरकर यांचे व्याख्यान होईल. या अभियानातून माणसाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचा प्रयत्न होणार असून शहरातील ५० हजार नागरिकांपर्यंत हा संदेश देण्यात येणार आहे.
परळीतील जिजामाता उद्यान परिसरातील फूड जंक्शन येथे पत्रकार परिषद झाली. या वेळी, जमातचे शहराध्यक्ष सय्यद अन्वर, जिल्हाध्यक्ष सय्यद इफ्तेखार यांची उपस्थित होती. सय्यद जाफर, सय्यद अफान, शेख मुदस्सीर, शेख अहमद यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार सय्यद सबाहत यांनी केले.
हेही वाचा - हिंदू संस्कृतीची टिंगलटवाळी खपवून घेणार नाही - हिंदू राष्ट्र सेना