बीड - वीज चोरीचे आकडे काढण्याची मोहीम महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. वीजचोरीचे आकडे पकडल्यानंतर एका महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना आहे. याबाबत बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यास खुपसून टाकण्याची धमकीही देण्यात आली असल्याचे तक्रारदाराने म्हटले असून सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी वीज चोरीचे आकडे काढून रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप भोळे, अधिक्षक अभियंता श्री आर जी कोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरीचे आकडे काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
काटकर वस्ती, खापरपागंरी, बीड येथील वस्तीवर वीज चोरीचे आकडे टाकून विजेचा वापर होत असल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानेश्वर शिंदे व त्यांचे सहकारी संदीप पाखरे, किरण अंदुरे, रामेश्वर लाटे, गणेश जाणवळे यांनी येथील वीज चोरीचे आकडे काढले. आकडे का काढले म्हणून काढलेले आकडे हिसकावून घेवून अंगद रावसाहेब काटकर व त्यांची पत्नी, सुग्रीव रावसाहेब काटकर, बाळू बाबासाहेब काटकर, बाबासाहेब रावसाहेब काटकर, मनोज सुग्रीव काटकर यांनी कर्मचाऱ्यांना मारहान करून शिविगाळ केली व पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यास खुपसून टाकू अशी धमकी दिली. याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानदेव शिंदे यांच्या फिर्यादिवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.