बीड - विधानसभा 2019 निवडणुकीच्या काळात सुरक्षेसाठी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना ज्या खानावळीवाल्याने खाऊ घातले, त्याचे बिल पोलीस विभागाने अद्याप दिले नाही. त्यामुळे खानावळचालक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अगोदरच कोरोनाने हे कुटुंब आर्थिक संकटात आहे. बिल तात्काळ द्यावे, या मागणीसाठी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर खानावळ चालकाने अमरण आंदोलन सुरू केले आहे.
परळी येथे विधानसभा निवडणूक काळात मोदींची सभा पार पडली होती. त्यांच्या बंदोबस्ताला लावलेल्या पोलिसांच्या फौज फाट्याला विद्यानगरातील खानावळ चालक संजय रामलिंग स्वामी यांनी जेवण पुरवले. जवळ होते नव्हते, तेवढे भांडवल व बाजारात निर्माण केलेली पत पणाला लावून उसनवारी करत पोलीस यंत्रणेला त्यांनी 15 ते 20 ऑक्टोबर 2019 या काळात खाऊ घातले. मात्र, त्याचे पैसे अद्याप पोलीसविभागाकडून देण्यात आले नाहीत. त्यामुळे संजय व त्यांच्या पत्नी बुधवारी पोलीस मुख्यालय बीड येथे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. खानावळीचे तब्बल 2 लाख 62 हजार रुपयाचे बिल पोलीस विभागाकडे थकलेले आहे.
खानावळ चालकास पत्नीचे दागिनेही विकावे लागले -
जवळचे भांडवल संपले, बाजारातली पत गेली, देणेकरी दारात घेऊन बसू लागले, परिणामी उध्वस्त झालेल्या या कुटुंबाने पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा प्रशासन कार्यालयाचे उंबरठे झिजवले. कार्यालयाच्या फेऱ्या घालताना, येणाऱ्या खर्चासाठी खानावळ चालकास पत्नीचे दागिनेही विकावे लागले. त्यांची ही अवस्था पाहूनही निगरगट्ट प्रशासनाला घाम फुटला नाही. अखेर संजय रामलिंग स्वामी यांनी पोलीस विभागाकडून बिल वसूल करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
हेही वाचा - कोविड काळात गर्भवती मातांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक