बीड - अनैतिक संबंधास नकार दिल्याने एका विवाहित महिलेचे अपहरण करुन नाक कापल्याची घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. या गुन्ह्यातील दोषी माय-लेकाला गुरुवारी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या. एम.बी.पटवारी यांनी पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
घटना काय होती?
अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी घाट येथील रघुनाथ दत्तू फड हा अनैतिक संबंध ठेवण्यासाठी चार-पाच वर्षांपासून पीडितेला जबरदस्ती करत होता. 9 जानेवारी 2016ला पीडिता तिच्या मुलाला भेटण्यासाठी माहेरहून अंबाजोगाईला येत होती. त्यावेळी रघुनाथ फड आणि त्यांची आई सत्यभामा दत्तू फड या दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून धर्मापुरी येथे जवळच्या डोंगरातील झाडीत नेले. तिथे रघुनाथने वस्तऱ्याने पीडितेच्या नाकाचा शेंडा कापला आणि तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून रघुनाथ आणि सत्यभामा या दोघांवर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करून पोलीस निरिक्षक आर.एन. चाटे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी अंबाजोगाई विशेष जिल्हा व सत्र न्या. एम.बी. पटवारी यांच्या न्यायालयासमोर झाली. सरकार पक्षाकडून सात साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. पटवारी यांनी सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून रघुनाथ आणि सत्यभामा फड यांना दोषी ठरवले. पीडितेच्या नाकाचा शेंडा कापून तिला विद्रूप केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, अपहरण केल्यामुळे तीन वर्षे सक्तमजुरी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
हेही वाचा - मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे