बीड - शेजारच्या शेतातील विद्युत पोलवरून वायर अंथरून विजेचे कनेक्शन घेतलेल्या वायरवर पाय पडल्याने शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना बीड तालुक्यातील जरूर येथे घडली आहे. वैजिनाथ शामराव बरडे (वय ३०), शोभा वैजिनाथ बरडे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
![couple died](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12045785_t.jpg)
पत्नीला वाचवायला गेले अन् -
बीड तालुक्यातील जरुड येथील रामकिसन विश्वनाथ काकडे याने शेतात विनापरवाना लाईट घेतलेली आहे. त्यासाठी त्याने खराब वायर वापरून विद्युत तारेवर आकडा टाकला होता. वायर पुर्ण खराब झाल्याने केवळ तार राहिली होती. पिंपळनेर परिसरात जोराचे वारे सुटल्याने वायर ढिले होऊन पुष्पा विष्णू काकडे यांच्या शेताजवळील ओढ्यातील रस्त्यावर पडले होते. त्याठिकाणाहून वैजिनाथ शामराव बरडे आणि त्यांची पत्नी शोभा वैजिनाथ बरडे हे जात असताना शोभा यांचा पाय वायरवर पडला. विद्युत पुरवठा सुरू असल्यामुळे त्यांना शॉक लागून खाली कोसळल्या. त्यावेळी वैजिनाथ यांना पत्नी खाली का पडली? हे न समजल्यामुळे त्यांनी पत्नीला उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शॉक लागल्याने दोघांचाही यात मृत्यू झाला.
हेही वाचा - पोलीस निरीक्षकाचा महिला पोलीस कर्मचाऱ्यावर घरात घुसून अत्याचार
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल -
घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी ठाणेप्रमुख सपोनि शरद भुतेकर, फौजदार खरात, सानप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घेऊन घटनेचा पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी विद्युत तारेवर आकडा टाकणारे रामकिसन विश्वनाथ काकडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, मृत वैजिनाथ बरडे यांचा मुलगा अक्षय बरडे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम ३०४ प्रमाणे आरोपी रामकिसन विश्वनाथ काकडे याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.