बीड - मागील दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील रिमझिम पाऊस सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण टक्के भरले असून रविवारी बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जलपूजन केले. याबरोबरच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात 15 ऑगस्ट पासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बीड शहराला पाणीपुरवठा करणारा करणारे बिंदुसरा धरण 99 टक्के भरले आहे. या शिवाय माजलगाव बॅक वॉटरमध्ये 75 टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. यंदा समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदी आहे. बीड जवळील बिंदुसरा धरणातील पाण्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जलपूजन करून आगामी काळात बीड शहरासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे सांगितले.
येत्या 24 तासात जर पावसाचे प्रमाण वाढल्यास बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष यांनी केले.
नदीकाठी असलेल्या नागरिकांनी तात्काळ स्थलांतर करण्याचे आवाहन देखील, यावेळी करण्यात आले. सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.
बिंदुसरा धरणावरील जलपूजन प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, पाणीपुरवठा सभापती रवींद्र कदम, नगरसेवक गणेश वाघमारे यांच्यासह नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना परिस्थिती असल्याने शासनाचे नियम पाळून हा जल पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.