बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्याततील पाचेगाव येथील गावकरी व बलात्कार प्रकरणातील पीडित महिला सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात समोरासमोर आले. पीडित महिला ही खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. तर पीडितेने मी उद्ध्वस्त झाले आता मला गावातून हाकलून लावले जात असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे.
1 जानेवारी 2015 रोजी एक महिला कापूस वेचणीसाठी पाचेगावला गेली होती. पाचेगाव येथून बीडला येत असताना खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमध्ये बसली असता चालकाने अन्य तीन मित्राच्या मदतीने तिला बाजूच्या शेतात नेऊन तिच्यावर बळजबरीने सामूहिक अत्याचार केला. नंतर तिला गावातील तिच्या घरी नेऊन पुन्हा बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात 22 ऑक्टोबर 2020 रोजी न्यायालयाने चौघांना दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान तिच्या अल्पवयीन मुलीवर ही बीडमध्ये बलात्कार झाला होता. यावरून बीड येथील शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या पिडिता आपल्या तीन मुलांसह पाचेगाव येथे वडिलांच्या घरी राहाते. बलात्कार प्रकरणात चौघांना झालेल्या शिक्षेमुळे गावकरी व तिच्यात वितुष्ट निर्माण झालेले आहे.
पीडिता आणि गावकरी आमने-सामने
दोन दिवसापूर्वी पीडितेने सरपंच पती आणि 6 अन्य काही जणांवर गेवराई ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर पीडितेवर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा नोंद झाला आहे. सोमवारी ग्रामस्थ पोलीस अधीक्षक कार्यालयात पीडित महिलेविरुद्ध तक्रार घेऊन आले होते. पीडिता खोट्या तक्रारी करते व सतत धमकावून त्रास देत असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी दिले. याच वेळी पीडित महिला देखील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचली तिने गावकऱ्या समोरच आपली कैफियत मांडून आपल्याला गावातून हाकलण्याचा प्रयत्न गावकरी करत असल्याचे सांगत पीडित महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या टाहो फोडला. गावकरी व पीडित समोरासमोर आल्याने पोलिस अधीक्षक कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता.
दोन दिवसापूर्वी असा झाला वाद-
पीडित महिलेची पाचेगाव लगत शेती आहे. या शेतातील पिकांना सरपंच पती इमू पठाण यांच्या खाजगी बोरचे पाणी पिडितीने वापरले. यावरुन वाद सुरु झाला. सरपंच पती संपूर्ण गावाला स्वतःच्या खाजगी बोरचे पाणी पिण्यासाठी देतात. मात्र, पीडितेने ते पाणी पिकांसाठी वापरले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. हा वाद अधिकच चिघळला.
परस्पर विरोधी गुन्हे दाखल-
पीडित महिलेने सरपंच पती इमू पठाण यांच्यासह अन्य सहा जणांवर गेवराई ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ग्रामपंचायतीचे शिपाई शिवाजी थोरात यांच्याशी बोअरच्या पाण्यावरून बाचाबाची झाली व शिवाजी थोरात यांनी पीडित महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
या सगळ्या प्रकारानंतर पोलीस अधीक्षक आर राजा यांनी पीडित महिला व ग्रामस्थांना ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. विनाकारण कोणावर खोटे गुन्हे नोंद होणार नाही तसेच पीडितेला ही त्रास होणार नाही अशी भूमिका पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी घेतली आहे.