बीड - सततच्या दुष्काळावर मात करण्याच्या उद्देशाने बीड जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये श्रमदानाची चळवळ उभी राहिली आहे. आता या बीडच्या श्रमदानाचा पॅटर्न राज्याबाहेर पोहोचला आसल्याचा प्रत्यय येत आहे. आंध्र प्रदेश मधील अनंतपूर जिल्हातील १८ शेतकऱ्यांनी रविवारी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दिपेवडगाव येथे सुरु असलेल्या श्रमदानाच्या कामाला भेट दिली आणि श्रमदानसुध्दा केले. केज तालुक्यातील दिपेवडगावचा पॅटर्न आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यात राबवणार असल्याचे 'आय अॅम बेंगलोर' या संस्थेच्या सदस्यांनी दीपेवडगाव येथील नागरिकांना सांगितले.
सातत्याने पाच वर्षांपासून बीड जिल्ह्यात असलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी श्रमदानाची चळवळ बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. शेकडो गावांमध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण श्रमदानाच्या कामावर येत आहेत. लोकांनी लोकांसाठी उभी केलेली लोकसहभागाची चळवळ मोठी होत आहे. बीड जिल्ह्यातील श्रमदानाचा पॅटर्न आंध्रप्रदेशमधल्या अनंतपूर जिल्ह्यात 'आय अॅम बेंगलोर' संस्थेच्या पुढाकाराने राबविण्यात येणार आहे. बेंगलोर ही संस्था गटशेती व शेतीमाल प्रक्रिया उद्योगावर आंध्रप्रदेशात काम करते.
प्राध्यापक शास्त्री यांच्या माध्यमातून गटशेतीचे मोठे काम आंध्रप्रदेशमध्ये अनंतपूर जिल्ह्यात सुरू आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसावर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवला पाहिजे, यासाठी आता अनंतपूर जिल्ह्यातील शेतकरी सरसावले असून, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाथरा, आवसगाव, पळसखेडा व दिपेवडगाव येथील महाश्रमदानाला अनंतपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली. त्यांनी काम सुरू करण्याची पद्धत, ग्रामस्थांची एकजूट करण्यासाठी काय करावे लागते. हे आत्मसात करण्याच्या उद्देशाने दिपेवडगावला भेट दिली व तेथील नागरिकांशी चर्चा करत श्रमदान केले.
सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे पाणी पातळी खालावत आहे. पाणी पातळी वाढवण्यासाठी शासनाच्या मदतीची वाट पाहण्यापेक्षा स्वतः लोकसहभागातून जलसंधारणाचे काम करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दिपेवडगाव येथे ग्रामस्थांना एकत्र करून लोकसहभागाची चळवळ मोठ्या नेटाने पुढे नेली, असे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर योगिनी थोरात यांनी सांगितले.