छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : छत्रपती संभाजीनगरमधील हाणामारी प्रकरणावरून राज्यात तणाव निर्माण झाला असतानाच पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. काल मिरवणुकीत दोन गटात वादातून दगड फेक झाल्याचे प्रकरणामुळे शहरात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ओहर गावामध्ये दोन गटात दगडफेक व तुफान हाणामारी झाली. यात काही नागरिक जखमी झाले असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, किरकोळ वादातून ही घटना झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दोन गटात वाद : रामनवमीच्या मिरवणुकीत ओहर गावात किरकोळ वादातून दोन गटात गुरुवारी वाद झाला. बॅनर फाडल्याचा वाद झाला होता. भांडण झाल्याने राम नवमी सोहळ्याला गालबोट लागले. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांत केले. मिरवणूक झाल्यावर नागरिक घरी गेले. गावात चोख बंदोबस्त लावण्यात आला. मात्र, सकाळी अचानक दोन गटात दगडफेक सुरू झाली. यात सात ते आठ जण जखमी झाले असून जखमींवर शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील दगडफेकीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. दरम्यान, ओहरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दोन ठिकाणी दगडफेक : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी 24 तासात दोन ठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. किराडपुरा भागात दोन गटातील वादातून जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. दरम्यान तो वाद संपतो ना संपतो तोच सायंकाळी रामनवमीच्या मिरवणुकीत पुन्हा दोन गट आमने-सामने आले. त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि एकमेकांवर सकाळी दगडफेक झाली. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, हा वाद किरकोळ स्वरूपाचा असून वैयक्तिक वादातून या घटना झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हे दाखल करून गुन्हेगारांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त चिलवंत नांदेडकर माध्यमांसोबत बोलताना सांगितले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कुठलीही अनुचित कृती करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.