औरंगाबाद - भाजपप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी त्यांच्या जावयांचे पोलिसांनी पकडलेले ५० लाख रुपये सोडवून दिल्याचा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या या आरोपामुळे युतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक फैऱ्या झाडल्या जात आहेत. त्यामुळे आता युतीच्या नेत्यांचा वाद चांगलाच पेटणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
चंद्रकांत खैरे यांच्या आरोपाला उत्तर म्हणून भाजप नगरसेवकाने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. त्या प्रतिक्रियेवर खैरे यांनी संताप व्यक्त करत योग्यवेळी उत्तर देण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद टोकाला जाण्याची भीती आहे.
औरंगाबादचे खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. रावसाहेब दानवे यांनी त्यांचे जावई आणि औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे पोलिसांनी पकडलेले ५० लाख रुपये सोडवून घेतल्याचा आरोप केला आहे. सासऱ्याने जावयाला रसद पुरवली असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. तर एकदा ही रक्कम पकडली तर ती सोडवुन घेतली, असेही ते म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे.
भाजप नगरसेवकांनी युती धर्म पाळला नाही, त्याचे पुरावे आमच्याकडे आल्यावर आम्ही ते देऊ, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. त्याबरोबर या विषयाला घेऊन शिवसेनेने आढावा बैठक घेतली. या बैठकीत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.