औरंगाबाद - शालेय शुल्क न भरल्याने औरंगाबादमधील एका खासगी शाळेने काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले. पालक शालेय शुल्क भरण्यास तयार आहेत मात्र, शाळेने अतिरिक्त शुल्क रद्द करावे, शुल्क भरण्यास सवलत द्यावी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नये, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.
औरंगाबादच्या चिखलठाणा परिसरातील युनिव्हर्सल शाळेत शुल्क न भरणाऱ्या ४०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात नसल्याचा आरोप पालकांनी केला. शाळेकडून आकारण्यात आलेल्या शैक्षणिक शुल्कात बसचे पैसे, जेवणाचे पैसे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे पैसे आकारण्यात आले आहेत. यापैकी यावर्षी कुठल्याच सुविधेचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नाही. त्यामुळे फक्त शैक्षणिक शुल्क आकरले जावे, अशी मागणी पालकांनी केली होती. ही मागणी शाळेने अमान्य केल्याने पालकांनी आंदोलन करत न्याय मिळवून देण्याची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. दोन महिने शाळा झाली नाही. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे शाळांकडून वार्षिक शुल्क आकारताना प्रत्येकवेळी लावण्यात येणारे अतिरिक्त शुल्क लावू नये, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. काही शाळांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पालकांना दिलासा दिला आहे. मात्र, औरंगाबादच्या युनिव्हर्सल शाळेकडून पालकांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी वारंवार सक्ती केली जात आहे. शाळा बंद असूनही जेवणाचे पैसे, प्रवासी बसचे पैसे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे पैसे, संगीत आणि नृत्य वर्गाचे पैसे असे अतिरिक्त शुल्क शाळा आकारत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला.
याबाबत शाळेला आणि शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करूनही कुठलाच दिलासा मिळाला नाही. इतकेच नाही तर शैक्षणिक शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे युनिव्हर्सल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन केले. यावेळी शाळा प्रशासनाने प्रसिद्धी माध्यमांना सामोरे जाण्यास नकार दिला.