औरंगाबाद - राज्यात सध्या राम मंदिर आणि हनुमान चालीसेवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यात मनसे मस्जिदवरील भोंग्याला हनुमान चालीसा लावून आव्हान देण्याची भाषा करत असल्याने राज्यात हिंदू मुस्लिम अशी फळी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, औरंगाबादच्या नारायणपूर गावात वेगळाच आदर्श निर्माण करून राजकीय स्टंटबाजीला उत्तर देण्यात आले.
हेही वाचा - महापालिकेचा प्रारूप आराखडा फुटला, सेना आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
मुस्लिम बांधवानी हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी घेतला पुढाकार - वाळूज जवळ असलेल्या नारायणगावात हनुमान मंदिराचा बुधवारी जीर्णोद्धार सोहळा पार पडला. विधिवत पूजन करून मंदिराचे नव्याने निर्माण कार्य केले गेले. हा जीर्णोद्धार विशेष आहे कारण या कार्यात मुस्लिम बांधवाचे मोलाचे योगदान ठरले. गावात हातावर मोजण्या इतके हिंदू कुटुंब, तर ऐंशी टक्के मुस्लिम बांधव राहतात. गावाचे सरपंच देखील मुस्लिम आहेत. गावातील जुन्या हनुमान मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवानी घेतला आणि पाहता पाहता मंदिराचे नवनिर्माण पूर्ण झाले.
गावात मुस्लिम बांधवांची संख्या अधिक - वाळूजपासून तीन किलोमीटर अंतरावर नारायण गाव सध्या चर्चेचा विषय बनले आहे. गावाची लोकसंख्या जवळपास 3 हजार 500 इतकी आहे. त्यात मुस्लिम बांधवांची संख्या 2 हजार 800 आहे, तर दलित समाजाची 400, गोसावी समाज 300 च्या जवळपास आहेत. या गावात हिंदू कुटुंब बोटावर मोजण्या इतकी आहेत. या गावात जुने हनुमान मंदिर आहे. त्याची पडझड झाल्याने सरपंच नासेर पटेल यांनी पुढाकार घेत गावातील इतर सदस्य आणि नागरिकांशी चर्चा करत जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नासेर पटेल, काकासाहेब फांदाडे यांनी फेब्रुवारी महिन्यात मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात केली. तीन महिन्यात काम पूर्ण झाल्यावर 1 जून रोजी मंदिरात विधिवत पूजन करून हनुमानाची पुनः प्रतिस्थापना करण्यात आली. या कामात उपसरपंच मजीद पटेल, ग्रामविकास अधिकारी ए.आर. राठोड, सब्जर पटेल, अय्युब पठाण, लाल पटेल, दर्शनसिंग संधू, संजय घाडगे, हाशम पटेल यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
हेही वाचा - Brothers Died In Farm Lake: धक्कादायक; शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावाचा पाण्यात बुडून मृत्यू